गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (15:42 IST)

वर्ल्ड कप 2019: चौकाराच्या नियमावर सोशल मीडियात संताप

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात काल झालेल्या अंतिम सामन्याचा थरारक शेवट झाला. काल झालेल्या सामन्यात अनेक गोष्टी गाजल्या. सुपर ओव्हरमध्ये टाय झाल्यानंतर ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या संघाला विजयी घोषित करण्यात आलं. या नियमाबदद्ल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक स्कॉट स्टायरिस ने थेट आयसीसीवर निशाणा साधला आहे. आयसीसी तुम्ही एक जोक आहात अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
 
सिद्धार्थ वैद्यनाथन यांच्यामते जर पावसामुळे सामना रद्द झाला तर वर्ल्ड कप शेअर करायला हवा होता. ज्या संघाचे जास्त चौकार असतात तो संघ जिंकतो. वा रे क्रिकेट असं ते तिरकरसपणे पुढे व्यक्त होतात.ब
 
विनोद देशपांडे यांच्यामते हा नियम वाईट आहे. स्पर्धेत एखादा संघ कितीदा जिंकला किंवा कुणाच्या विकेट कमी पडल्या या आधारावर विजेता घोषित करायला हवा होता. माझ्या मते दोन्ही संघ विजेते आहेत असं ते म्हणाले.
 
विनोद देशपांडे यांचाच धागा अनुराग कश्यप यांनी ओढला. फक्त चौकाराच्या आधारावर एखादा संघ जिंकत असेल तर कमी विकेटच्या बळावर का नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
क्रिकेटवाला या नावाने ट्विटर हँडल असलेल्या क्रीडा पत्रकार अय्याज मेमन यांच्या मते वर्ल्डकप शेअर करायला हवा होता. तोच माझ्या मते योग्य निकाल होता असं ते म्हणतात.
 
युजर देवेंद्र पांडे यांनी तर एक अजब तर्क मांडला आहे. जर मी शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली असती तर मी मंकडिंग केलं असतं असा अजब तर्क त्यांनी मांडला. खेळाचं मला काही पडलेलं नाही. चौकाराच्या बळावर विजेता कसा ठरू शकतो असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
तर माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरनेही आयसीसीवर निशाणा साधला आहे. हा नियम अतिशय वाईट असं ते म्हणाले. हा सामना टाय हवा होता असं त्यांना वाटतं. त्यांनी दोन्ही क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं.
 
तर सागर या युजरने या नियमाला पाठिंबा दिला आहे. आयसीसीच्या नियमामुळे न्यूझीलंड सेमी फायनल मध्ये पोहोचलं. लीग मॅचेस नंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे समान गुण होते. जर ते स्वीकारता तर हे का नाही? असा प्रश्न ते विचारतात.
 
शेषाद्री रामास्वामी म्हणतात की हा नियमच क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध होता. हा नियमच होता तर सुपर ओव्हरचा नियम लागू का केला?