1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (09:53 IST)

भारतातल्या वाढत्या बलात्कारांची संख्या समजून घ्या या 5 तक्त्यांमधून...

rape
14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
यानंतर पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनानं पीडितेच्या नातेवाईकांना विश्वासात न घेताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर देशभरात एकच आगडोंब उसळला.
 
हाथरसच्या या घटनेला आज (14 सप्टेंबर) दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं भारतात महिलांबाबत घडणाऱ्या घटनांमध्ये वर्षागणिक होणाऱ्या वाढीचा आढावा येथे घेतला आहे.
 
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात त्यांनी महिलांकडे पाहण्याच्या मानसिकतेत बदलाचं आणि स्त्रीद्वेषाविरोधात लढण्याचं आवाहन केलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्त्री-पुरुष समानतेबाबत पहिल्यांदाच बोलले नाहीत. यापूर्वीही त्यांनी महिलांचा आदर करण्याचं आवाहन केलंय.
 
2014 साली मोदींनी पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणातही त्यांनी महिलांवरील बलात्कारांच्या प्रकरणांचा निषेध नोंदवला होता आणि म्हणाले होते की, बलात्कार प्रकरणांबद्दल जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपली मान शरमेनं खाली झुकते.
 
भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार सत्तेत येऊन आठ वर्षे झालीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनून आठ वर्षे झाली. अजूनही भारतातील बलात्काराच्या गुन्ह्यात काहीच फरक पडला नाहीय. उलट या गुन्ह्यांची संख्या वाढतच जातेय.
 
वर्षागणिक बलात्कारांची संख्या वाढतेय. 2020 या वर्षाची आकडेवारी मिळण्यास मात्र कळू शकली नाहीय. कारण या वर्षी भारतात कोव्हिडमुळे लॉकडाऊन लागू होतं. परिणामी आकडेवारी गोळा करता आली नाही. अन्यथा, गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बलात्कार प्रकरणांची संख्या वाढतेच आहे.
 
2021 या वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यातच प्रसिद्ध केला. या वर्षात (2021) भारतात महिलांबाबत घडलेल्या गुन्ह्यांची सर्वाधिक संख्या नोंदण्यात आली.
 
महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते, बलात्कार प्रकरणांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मात्र, प्रशासनाच्या मते, आता योग्य पद्धतीनं प्रकरणांच्या नोंदी होतायत आणि लोक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवतायेत, त्यामुळे आकडेवारी वाढलेली दिसतेय.
 
गेल्या 6 वर्षांतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालाचा अभ्यास करून, आम्ही महिलांबाबतच्या गुन्ह्यांबाबतची आकडेवारीचं विश्लेषण केलं. हे विश्लेषण आपण खालील पाच तक्त्यांमधून जाणून घेऊ.
 
1) बलात्कारांचा वाढता आलेख
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या वर्षभरात भारतात 60 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. यातील 4 लाख 28 हजार 278 गुन्हे हे महिलांबाबत आहेत.
 
गेल्या सहा वर्षात गुन्ह्यांचही ही वाढ 26.35 टक्क्यांची आहे, म्हणजेच 2016 साली महिलांबाबतचे गुन्हे 3 लाख 38 हजार 954 इतकी होती.
 
2021 मध्ये महिलांबाबत घडलेले सर्वाधिक गुन्हे हे अपहरण, बलात्कार, घरगुती हिंसाचार, हुंड्यामुळे हत्या/आत्महत्या आणि गैरवर्तणूक या प्रकारातील आहेत.
 
2021 या वर्षात 107 महिलांवर अॅसिड हल्ला झाला, 1580 महिलांची तस्करी झाली, 15 मुलींची विक्री झाली आणि 2668 महिला सायबर क्राईमच्या बळी ठरल्या.
 
महिलांबाबतच्या गुन्ह्यात पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी आहे. यूपीत 56 हजारहून अधिक गुन्ह्यांची नोंद झालीय.
 
यूपीनंतर राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानात 40 हजार 738 गुन्ह्यांची नोंद झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागता. महाराष्ट्रात 39 हजार 526 गुन्ह्यांची नोंद झालीय.
 
2) बलात्कारांची राजधानी
गेल्यावर्षी, पोलिसांनी 31 हजार 878 बलात्कार प्रकरणांची नोंद केली.
 
2020 च्या तुलनेत ही प्रचंड वाढ आहे. 2020 मध्ये 28 हजार 153 बलात्कार प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. मात्र, 2016 मध्ये झालेल्या 39 हजार 68 बलात्कार प्रकरणांच्या नोंदीच्या तुलनेत 16 टक्क्यांची घट दिसून येते.
 
दरवर्षी हजारोंच्या पटीत बलात्कार प्रकरणांची होणारी नोंद पाहता, भारत जगातील 'रेप कॅपिटल' बनत चाललंय.
 
जगभरातील इतर देशांमध्ये इतक्याच किंवा याहून जास्त बलात्कार प्रकरणांची नोंद होते. मात्र, टीकाकारांच्या मते, भारताला बलात्कारांची राजधानी असं नाव पडण्यामागे बलात्कार पीडितांना मिळणारी वागणूक फार चिंतेची गोष्ट आहे.
 
समाजाकडून पीडितांना अत्यंत हीन वागणूक दिली जाते. अनेकदा तर पोलीस आणि न्यायव्यवस्थेकडूनही पीडितांबाबत नीट वागणूक दिली जात नाही.
 
नुकतेच, बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडण्यात आलं. 2002 सालच्या गुजरात दंगलीवेळी बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या करण्यात आली. यावरून भारताची आधीच जगभरात असलेली प्रतिमा आणखी गडद झाली.
 
3) अपहरण
2021 मध्ये भारतात तब्बल 76 हजार 263 महिलांचं अपहरण झालं. 2016 मध्ये महिलांच्या अपहरणाची संख्या 66 हजार 544 होती. म्हणजे, 2021 मध्ये 14 टक्क्यांनी अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.
 
अपहरणाच्या गुन्ह्यांचं पुढे हत्या, खंडणी, वेश्याव्यवसायासाठी मानवी तस्करी आणि जबरदस्तीने घरगुती काम या गुन्ह्यांमध्ये रुपांतर झाल्याचंही दिसून आलं.
 
मात्र, यातील 28 हजार 222 अपहृत महिलांना लग्नासाठी भाग पाडण्यात आलं.
 
तज्ज्ञ सांगतात की, यातील काही गुन्हे पुढे जाऊन चुकीचेही निघाले. कारण घरच्यांचा विरोध पत्कारून प्रियकरासोबत गेलेल्या मुलीबाबतही तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं आढळून आलं.
 
4) घरगुती हिंसाचार
भारतात घरगुती हिंसाचारांच्या प्रकरणातही मोठी वाढ झालीय.
 
घरात पती किंवा नातेवाईकांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा या प्रकारात समावेश होतो.
 
2021 मध्ये 1 लाख 37 हजार 956 महिलांनी घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवली.
 
ही आकडेवारी पाहता, प्रत्येक चार मिनिटाला घरगुती हिंसाचाराचा एक गुन्हा नोंदवला जातो.
 
2016 साली 1 लाख 10 हजार 434 प्रकरणांची नोंद झालीय, याचा अर्थ या प्रकरणांमध्ये 2016 च्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढ झालीय.
 
घरगुती हिंसाचार हा प्रकार भारतात नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील तीन महिलांपैकी एक महिला लिंगभेदाशी संबंधित हिंसेचा सामना करते आणि हे गुणोत्तर भारतात लागू होतं.
 
40 टक्क्यांहून अधिक महिला आणि 38 टक्क्यंहून अधिक पुरुषांनी नुकत्याच झालेल्या सरकारी सर्वेक्षणात म्हटलं की, जर एखादी महिला तिच्या सासरच्या मंडळींचा अनादर करत असेल, घर आणि मुलांकडे दुर्लक्ष करत असेल, न सांगता बाहेर जात असेल, सेक्ससाठी नकार देत असेल आणि नीट जेवण शिजवत नसेल, तर पुरुषाने महिलांना मारहाण करणं हे योग्य आहे.
 
5) हुंडाबळी
जरी भारताने 1961 साली हुंडा प्रथेवर बंदी आणली असली, तरी वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला रोख रक्कम, सोने आणि इतर महागड्या वस्तू भेट देण्याची शतकानुशतके जुनी परंपरा कायम आहे.
 
नुकत्याच झालेल्या जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, ग्रामीण भारतातील 95 टक्के विवाहांमध्ये हुंडा दिला जातो.
 
हुंडाविरोधी काम करणाऱ्यांच्या मते, पुरेसा हुंडा न दिल्याने नववधूंचा अनेकदा छळ केला जातो. अनेकदा सासरच्या मंडळींकडून वधूची हत्याही केली जाते.
 
अनेकदा पीडितेला जाळलं जातं आणि 'स्वयंपाक घरातील अपघात' असं सांगितलं जातं.
 
1983 साली भारतानं हुंडाबंदीसाठी कलम 498-अ कायदा आणला. मात्र, तरीही हुंड्यामुळे बळी जातच आहेत.
 
गेल्यावर्षी हुंड्याशी संबंधित 6 हजार 795 गुन्ह्यांची पोलिसात नोंद झाली. म्हणजे प्रत्येक मिनिटाला सरासरी 77 गुन्हे.
 
2016 साली हुंड्याशी संबंधित 7 हजार 628 गुन्ह्यांची नोंद झाली. म्हणजे 2021 साली 10.92 टक्क्यांची या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय.