1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (08:32 IST)

भाजपा आ. देवयानी फरांदे यांच्या भाषणावर आक्षेप, भाषण पाडले बंद, आता फरांदे कोरोना पॉझिटिव्ह

मागील महायुतीच्या कारकिर्दीत मराठा समाजासाठी चांगले काम केले, आत्ताच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, अशा आशयाच्या भाजपा आ. देवयानी फरांदे यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांचे मराठा समाजाच्या युवकांनी भाषण बंद पाडले. यावेळी बैठकीत चांगलाच गोंधळ झाल्याने पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. तसेच आयोजकांनी हस्तक्षेप करीत गोंधळ शांत केला. मात्र आता याच नाशिक मध्यच्या भाजप आमदार फरांदे यांचा करोना चाचणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
 
मुंबईतील दोन दिवसीय अधिवेशन संपवून प्रा. फरांदे त्यांचा जळगाव दौरा आटोपून नाशिकला परतल्या होत्या. तेथून आल्यावर सावधगिरी म्हणून त्यांनी करोना चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मध्यला काळात त्या अनेकांच्या संपर्कात आल्या. ते बघता संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करुन घ्यावी अशी विनंती त्यांनी ट्विट करत केली आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे रविवारी पारी त्या मराठा समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित होत्या. त्याठिकाणी प्रचंड गोंधळ गराड्यात त्यांच्या हातातून माईक हिसकवत त्यांचे भाषण थांबविण्यात आले. यावेळी कोणतेही सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळण्यात आले नाहीत. तर आमदार प्रा. फरांदेही विना मास्क याठिकाणी होत्या.
 
यात भाजपा आ. फरांदे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  राज्याच्या स्थापनेंनंतर इतिहासात प्रथमच मागील महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी चांगले काम केले. सारथी योजना, अण्णासाहेब पाटील महांमंडळ यासह अनेक योजना जाहीर केल्या आणि त्या लागु केल्या. योजना व विद्यार्थ्यांसाठी वतीगृह अशाप्रकारे विषय हाताळले. कोट्यावधी रुपयांचा निधी महामंडळाला दिला. त्यांची व्याप्ती या सरकारने वाढून दिली नाही, सारथीची योजना बंद केल्याचे सांगत फरांदे यांनी मागील सरकाराचे कौतुक केल्यानंतर त्यास राजु देसले यांनी आ. फरांदे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
 
मागील सरकारने काय केले ? हे सांगु नका, तुम्ही काय करणार ? हे सांगा, असे देसले यांनी त्यांना विचारणा केल्यानंतर फरांदे यांनी भाषण सुरूच ठेवले. यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत आणि जोरदार घोषणाबाजी करीत आ. फरांदे यांचे भाषण बंद पाडले. यामुळे चांगलाच गोंधळ झाला. यावेळी पोलीस व व कार्यकर्त्यानी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करीत गोंधळ थांबविला. त्यानंतर पुन्हा पदाधिकार्‍यांच्या भाषणाला सुरुवात झाली.