शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 18 एप्रिल 2021 (11:43 IST)

रेमडेसिवीरचा साठा जप्त करा; राज्य सरकारचे ‘एफडीए’ला आदेश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना लसीपासून ते औषधांपर्यंतचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी अनेक मेडिकलच्या बाहेर मोठ मोठ्या रागा लोकं लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कठोर पाऊल उचलली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून ‘एफडीए’ अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत. केंद्राने निर्यात बंदी केल्यानंतर इंजेक्शनचा साठा पडून राहिला आहे. हाच रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
 
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची निर्यात थांबवली होती. आता निर्यात थांबवल्यामुळे रेमडेसिवीरचा साठा देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.  राज्य सरकारने ज्याची निर्यात थांबवली आहे त्यांना महाराष्ट्रात रेमडेसिवीर विकण्याची परवानगी दिली आहे. मला पूर्ण खात्री आहे पुढच्या २०-२१ तारखेपर्यंत महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा नियमित होईल, असा विश्वास अन्न आणि औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे व्यक्त केला आहे.
 
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करुन दिली आहे. तसेच राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
 
 
केंद्र सरकारवरील टीकेनंतर रेमडेसिवीरच्या किंमती कमी
महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण आला आहे. त्यातच कोरोनावर उपायकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ राज्यातच नाही, तर देशात रेमडेसिवीरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या विनंतीनंतर रेमडेसिवीरच्या किंमतीत घेत करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत दिली.
 
सरकारच्या हस्तक्षेपानंतर ‘रेमडेसिवीर इंजेक्शन’च्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात सरकारला मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल मी औषध कंपन्यांचे आभार मानतो, असे मनसुख मांडवीया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांशी चर्चा केली होती. देशात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने या इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचे आणि उत्पादन वाढवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले होते. त्यामुळे आता उत्पादकांनी रेमडेसिवीरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.