शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2016 (17:28 IST)

मनाचे श्लोक (Manache Shlok)

"गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥"

अर्थ: गणेश, जो सर्व गुणांचा ईश आहे, जो सर्व निर्गुणाचा मूळ आरंभ आहे त्याला आणि   देवी सरस्वती, जी चारही वाणींची मूळ आहे 
 
तिला नमन करू आणि मग श्रीरामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू.
 
"मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥"
 
अर्थ: हे सज्जन मना, नेहमी भक्तिमार्गाने गेले म्हणजे साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची ज्याची निंदा होईल असे सर्व काही सोडून द्यावे आणि लोकाना जे जे वंदनीय आहे ते सर्व भक्तिभावाने करावे.
 
"प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥"
 
अर्थ: पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो.
 
"मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥"
 
 अर्थ: हे मना, पापवासना काही कामाची नाही. निव्वळ पापबुद्धी मनात बाळगू नये. आणि नीतिमत्ता सोडू नये. सारासार विचार मनात नेहमी असायला हवा.
 
"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥"
 
अर्थ: पापकर्म करण्याचे मनात आणू  नये. नेहमी सदाचाराचाच संकल्प मनात धरावा. विषयवासना मनात असू नये कारण त्यामुळे लोकांमध्ये छी थूच होते.