1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (18:09 IST)

शतकोटींचे बीज

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी
रघुकुल टिळक रामदासा अंतरीं
 
गणपतीच्या दिवसांमध्ये आरत्यांना उत्साह आल्यानंतर या ओळी आपण नेहमीच म्हणतो. पण या मधल्या शतकोटींचे बीज या शब्दांमध्ये एक रंजक कहाणी आहे जी आपल्यातल्या कित्येकांना माहीत नाही.
 
रामरक्षा म्हणताना आपल्या कित्येकांनी ही ओळ नेहमीच ऐकली आणि म्हटले असते- "चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्"
 
याचा थेट संबंध रामायणाशी आहे. रामायणाचं जवळपास प्रत्येक पद्य अनुष्टुप छंदांमध्ये आहे. अनुष्टुप छंदाच्या एका पद्यात बत्तीस अक्षरं असतात. रामायणाच्या सर्व कांडांमधल्या सर्व अध्यायांमधल्या सर्व श्लोकांची बेरीज करून त्याला ३२ ने गुणलं तर तो आकडा १०० कोटीच्या घरांमध्ये जातो. म्हणजेच रामायणाची एकूण अक्षर संख्या सुमारे  १०० कोटी आहे. त्यामुळेच रामरक्षेत रामायणाला "शतकोटिप्रविस्तर" असं म्हटलेलं आहे
 
एक पुराणकथा असं सांगते की देव दानव आणि मानव यांच्यामध्ये या अमृतमधुर रामायण काव्याच्या मालकीवरून भांडण झालं. भांडण मिटवायला तिन्ही पक्ष भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांनी १०० कोटी श्लोकांपैकी ३३ कोटी ३३ लाख ३३ हजार ३३३ श्लोक देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये समसमान वाटले. तरी सुद्धा उरलेल्या एका श्लोकाच्या मालकीवरून हे पक्ष भांडत राहिले. त्यामुळे भगवान शंकरांनी त्या श्लोकांमधल्या बत्तीस अक्षरांपैकी ३० अक्षरांची वाटणी दहा-दहा-दहा अशी तीन पक्षांमध्ये केली आणि उरलेली दोन अक्षरं स्वतःकडे ठेवली. अक्षरं म्हणजेच - राम.
 
ही अक्षरं म्हणजेच शतकोटींचे बीज.
 
आणि ही दोन अक्षरंसुद्धा त्रैलोक्याच्या उद्धारासाठी आणि मोक्षासाठी पुरेशी आहेत असा उपदेश भगवान शंकरांनी केला व स्वतःही "शतकोटींचे बीज" असलेल्या रामनामाचा जप सुरू केला. अशा प्रकारे रामभक्त समर्थांनी शंकराच्या स्तुतीसाठीही रामनामाचा संदर्भ वापरला.
 
-सोशल मीडिया साभार