1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 15 मार्च 2025 (21:43 IST)

सप्तपदी विधी

saptapadi
लाजाहोम नंतरची पुढील विधी सप्तपदी असते. या विधी मध्ये होमाच्या उत्तरेकडे तांदुळाच्या सात राशी मांडलेल्या असतात. या प्रत्येक राशींवर एक एक सुपारी ठेवतात. वधूने या सात राशी वरून चालायचे असते. आणि एकेक पाऊल झाल्यावर सुपारीला पायाच्या अंगठ्याने बाजूला करायचे असते. 
एकेका राशीवर उजव्या पायाचे पाऊल ठेवायचे हे सात पाऊले चालणे म्हणजे सप्तपदी विधी आहे. 
नवर देव नववधूचा हात धरून तिला प्रत्येक पावलावर चालायला मदत करतो. प्रत्येक पावलावर मंत्र म्हणतो.या मंत्राचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. सप्तपदीच्या प्रत्येक पावलाचा हा अर्थ आहे. 
 
पहिले पाऊल – तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करु. यात वर-वधू शुद्ध आणि पौष्टिक अन्नासाठी देवाकडे प्रार्थना करतात. यात जोडपे जीवनाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे जीवन सदैव समृद्ध करण्याचे वचन घेऊन पाऊल उचलतात.
दुसरे पाऊल – तू माझ्यासोबत दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो, आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ. निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याने नेहमी एकमेकांना आधार देण्याचे वचन.
तिसरे पाऊल – तू माझ्यासोबत तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करुन देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची समृद्धी करु. यात जोडपे संपत्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. एकमेकांशी विश्वासू राहणे आणि स्वत: साठी आणि कुटुंबासाठी श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगण्याचे वचन.
 
चवथे पाऊल – तू माझ्यासोबत चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू. सुखासाठी तसेच एकमेकांबद्दल आणि त्यांच्या संबंधित कुटुंबांबद्दल प्रेम आणि आदर वाढवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.
 
पाचवे पाऊल – तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करु. संततीसाठी देवाकडे प्रार्थना करतात.
 
सहावे पाऊल – तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो. शांतीपूर्ण दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.
सातवे पाऊल – तू माझ्यासोबत सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृद्यात जतन करु. वर-वधू सहवास, एकत्रता, निष्ठा आणि समंजसपणासाठी देवाला प्रार्थना करतात. एकमेकांचे मित्र बनवण्याची आणि आयुष्यभर मैत्री निभावण्याची परिपक्वता देण्याची प्रार्थना करतात. यात नवरा वधूला म्हणतो की आता सात सात फेरे पावले माझ्यासोबत चालली आहेस यास्तव माझी दृढ सखी हो. शेवटच्या फेर्‍यात जोडपे विश्वाच्या शांतीसाठी देखील समंजस जीवन, निष्ठा, एकता आणि सहवासासाठी प्रार्थना करतात.
 
ही सात वचने एक पाया प्रदान करतात असे मानले जाते ज्याभोवती मजबूत आणि शाश्वत नातेसंबंध बांधले जातात. जरी आपण वैदिक काळापासून खूप दूर आलो आहोत, परंतु जेव्हा वधू आणि वर दोघेही एकमेकांना समान म्हणून वचन देतात तेव्हा हे सर्व खरे ठरतात.
 
सप्तपदी झाल्यावर नवरदेव नववधूच्या मस्तकाला आपले मस्तक स्पर्श करतो आणि मंगल कलशातील पाणी स्वतःच्या आणि वधूच्या मस्तकाला लावतो. शांती असो, तुष्टी असो, पुष्टी असो, म्हणंत 
वधूच्या पायात चांदीची जोडवे घालतात. या वेळी करवली वधूच्या पायाचा अंगठा हाताने दाबते. 
सप्तपदी झाल्यावर विवाह पूर्ण मानला जातो. 

त्या नंतर विहिणींची पंगत बसते. या मध्ये वर आणि वधू एकेमकांना घास भरवतात आणि उखाणा घेतात. या पंगतीत वधूची आई किंवा मावशी, आत्या गाणे म्हणते याला विहीण म्हणतात. या मध्ये आम्ही तुम्हाला आपली मुलगी दिली आहे तिचा नीट सांभाळ करावा असे सांगितले जाते. जेवण झाल्यावर वधूची आई वर पक्षाच्या बायकांच्या हातावर साखर आणि चांदीच्या लवंगा ठेवून त्यांना हात धुण्यासाठी पाणी देते. 
Edited By - Priya Dixit