1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पंगतीमधील आयुष्य रुपी पत्रावळ

food
श्रीदत्त, क्षेत्रस्थानी छानशी जेवणाची पंगत बसलेली आहे. समोर असणाऱ्या पत्रावळीवर उत्तमोत्तम अन्न पदार्थ वाढण्याकरीता तयार होऊन येत आहेत. जेवणासाठी नाना प्रकारच्या केलेल्या पक्वान्नांचा सुवासही दरवळत आहे. सर्वत्र नुसता घमघमाट सुटलेला आहे.
 
वाढपी येऊन क्रमाक्रमाने एक एक जिन्नस पत्रावळीवरती वाढला जाऊ लागला. पत्रावळ पूर्णपणे वाढून झाली. 'वदनी कवळ घेता' श्लोक म्हणून झाले. नमः पार्वतीपते हरहर महादेव. जयजयकार देखील म्हणून झाला. आणि जेवायला सुरुवात झाली. आहाहा... बेत ऊत्तम होता. जेवता जेवता अखेरीस 'गोडासाठी जागा करा' 'गोडासाठी जागा करा' असे ओरडत, ओरडत एक वाढपी आला. त्याने गोड खमंग अशी पक्वान्ने' वाढायला आणली होती.
 
या जेवणावळी मधील पत्रावळीचा व वाढल्या जाणाऱ्या पदार्थांचा आणि वाढप्याचा जर पूर्णपणे विचार केला. तर त्याचा खालीलप्रमाणे अर्थ निघतो.
 
ही जी पत्रावळ वाढलेली आहे ना ती म्हणजे आपले आयुष्य आहे. नानाविध पदार्थ वाढायला येत आहेत. म्हणजेच आपल्या आयुष्यामधे येणारे निरनिराळे विविध टप्पे आहेत. (आपण नेहमी म्हणतोच नां ? आयुष्यात समोर काय वाढून ठेवले आहे? देव जाणे) ह्या वाढण्यासाठी आलेल्या पदार्थांमध्ये मीठ हे घातलेले आहेच. पण तरीही पत्रावळीत आणखी जादा मीठ वाढले गेलेले आहे. ह्याचा अर्थ असा की आयुष्यातील चालू कर्मभोगांसोबत (प्रारब्धासोबत) गत कर्मभोगांचाही परिणाम अर्थात गत "प्रारब्ध" हे देखील या बरोबरच भोगून संपवायचे आहे.
 
या पंगतीमधे वाढायला येणारा वाढपी म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो पुढे, पुढे सरकणारा 'काळ' आहे. जेव्हा हाच 'काळ' श्रीदत्त कृपेने "मोक्षरुपी" अशी गोड पक्वांने  वाढायला घेऊन येतो. तेव्हा तो ओरडून, ओरडून जागृत करुन सांगत असतो. बाबारे आता बस कर.! आपण स्वताहून प्रपंच रुपी पदार्थ आता जरा बाजूला सार आणि भगवत भक्ती करुन जीवनात मोक्ष प्राप्ती मिळव.
 
ती मिळवण्यासाठी जागा पटापट रिकामी कर. अर्थात कर्मभोग आहेत ते भोगून संपव आणि मोक्षाला प्राप्त हो.
 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
 
- सोशल मीडिया साभार