पूर्वजांची थोरवी
- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
पितृपंधरवडा म्हणजे महालय पक्ष सुरु होत आहे. भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितरांचे स्मरण करुन त्यांच्या नावाने दानादी धार्मिक कार्य करण्यास योग्य असा समजला गेला आहे. महालय या शब्दाचा अपभ्रंश म्हाळ असा होऊन महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी या दिवशी केल्या जाणार्या विधीस म्हाळ असे म्हणतात. या पंधरवडय़ात पितरांचा वास मृत्युलोकी असतो अशी समजूत आहे. आपल्या पितरांपैकी जे कोणी वर्षातील ज्या तिथीस मृत्यू पावलेले असतात त्यांच्या नावाने या पंधरवडय़ातील त्या तिथीस श्राद्ध करावे असे सांगितले आहे. या पंधरवडय़ातील नवमीस अविधवा नवमी असे नाव आहे. मृत सौभाग्यवती अशा निकटच्या आप्त स्त्रियांच्या नावाने या दिवशी त्यांचे श्राद्ध केले जाते. पण या दिवशी आईच्या नावाने श्राद्ध करण्याची प्रथा असून या नवमीला देशाच्या अनेक भागात विविध नावांनी ओळखले जाते. या पंधरवडय़ात ज्या दिवशी भरणी नक्षत्र असेल त्या दिवशी आधीच्या वर्षभरात मृत्यू पावलेल्यांच्या नावाने भरणी श्राद्ध केले जाते. या पक्षाची अमावास्या सर्वपित्री अमावास्या म्हणून सर्व पितरांच्या स्मरणार्थ श्राद्धतिथी मानली जाते. या विधीमागील खरा हेतू ओळखला पाहिजे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाते ते. ते अमुकच पद्धतीने केले पाहिजे असा दंडक नाही. ज्यांना पारंपारिक धार्मिक विधी आचरणे जमण्यासारखे नसेल त्यांनी त्या त्या तिथीच्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करावे आणि पितरांनी तृप्त असावे अशी प्रार्थना करावी, असे सांगितले आहे.पितरांच्या नावाने केले जाणारे दान हे विशेष भाग्यकारी समजले गेले आहे. अशा पुण्यवंतांचे पितर तृप्त आणि समाधानी असतात, तर पापाचरण करणार्यांचे पितर हे अशक्त आणि निर्बल असतात असा एक समज असून कोणी हाडकुळा आणि किरकोळ देहाचा माणूस पाहिल्यानंतर त्याला पाप्याचे पितर असे म्हणण्याची प्रथा आहे. त्याचे मूळही या लोकसमजात आहे. पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून का ? असे माधव ज्युलियनांनी विचारले आहे. केवळ बोलून किंवा मोठेपणा सांगून आपण पूर्वजांचे वारसदार ठरत नाही. त्यासाठी स्वकर्तृत्वाने उच्चपद प्राप्त करावे लागते. दुसरे असे, थोरवी सांगता येईल असे पूर्वज सर्वांनाच मिळतील असेही नाही. पण पूर्वज उच्चपद भूषविलेले असोत किंवा नसोत त्यांचे स्मरण आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृततेचे लक्षण आहे. आपल्या आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृततेचे लक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक शोध लावले, अनेक बांधकामे केली, रस्ते बांधले, विहिरी खोदल्या तसेच आपणा सर्वांचे म्हणजे त्यांच्या वंशजांचे जीवन सुखी व्हावे म्हणून अनेक गोष्टी केल्या. पूर्वजांनी लावलेल्या वृक्षांची मधुर फळे पुढल्या पिढीच्या पदरात पडत असतात आणि हे केवळ झाडांच्या फळांपुरतेच मर्यादित नाही तर पूर्वजांच्या इतर प्रयत्नांच्या फळांनाही ते तेवढेच लागू पडते. पूर्वजांनी मांडलेले विचार तसेच पूर्वजांच्या परंपरेतून निर्माण झालेले आचार या सर्वांच्या आधारावर पुढील पिढय़ा उभ्या राहत असतात. अतिपरिचयामुळे पूर्वजांचे हे ऋण सहजासहजी ध्यानात येत नाही.वर्षातील एक विशिष्ट पक्ष आपल्या पूर्वजांची स्मृती ठेवण्यासाठी राखून ठेवावा, ही दक्षता समाजात कृतज्ञता बुद्धी राहावी या दृष्टीने पोषक अशी आहे. आजची पिढी ही पुढच्या पिढीची पूर्वजच असते. पूर्वजांचे स्मरण करताना फक्त धार्मिक विधीच केले पाहिजेत असे नाही तर वेगवेगळ्या संस्थांना पूर्वजांच्या नावाने देणग्या देणे किंवा पूर्वजांच्या नावाने वाचनालयांना पुस्तके देणे अशा प्रकारेही आपल्या मनातील श्रद्धा व्यक्त करता येऊ शकते.