1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: यवतमाळ , सोमवार, 25 मार्च 2019 (13:43 IST)

साहित्य संमेलनातून विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा मांडणाऱ्या वैशाली येडे प्रहार संघटनेने लोकसभेची उमेदवारी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सुद्धा उडी घेतली आहे. 92 व्या साहित्य संमेलनातून विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा सारस्वतांसमोर ठामपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांना प्रहार संघटनेने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वैशाली येडे या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. शेतकरी, शेतकरी विधवा महिला आणि कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे वैशाली येडे यांनी बोलताना सांगितले. 
 
राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे दुःख दिल्ली दरबारी मांडण्यासाठी माझी उमेदवारी असून, मला राजकारण करता येत नाही, असे वैशाली येडे म्हणाल्या. विशेष म्हणजे, दारुबंदीच्या मागणीसाठी दारुच्या दुकानासमोर दूध वाटप करुन, त्यानंतर रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही वैशाली येडे यांनी सांगितले. 
 
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा जिल्हा अशी दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात 92 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या नियोजित उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याने, शेतकरी महिला वैशाली येडे यांनी संमेलनाच्या उद्घटान केले. शिवाय, सारस्वतांच्या व्यासपीठावरुन विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा ठामपणे मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली होती. 
 
यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी याच रिंगणात आहेत. त्यामुळे वैशाली येडे यांना या दोन दिग्गजांचा सामना करावा लागणार आहे.