1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 31 मार्च 2024 (10:44 IST)

अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वेंनी घेतला मोठा निर्णय ; म्हणाल्या

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सध्या रामटेक मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली. जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभेची उमेदवारी रद्द होताच रश्मी बर्वे यांनी पत्रकारपरिषद घेत संताप व्यक्त केला.
 
दरम्यान, अर्ज बाद झाला असला तरी बर्वे माघार घ्यायला तयार नाहीत.त्या निवडणूक आयोग आणि जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयानंतर त्यांनी भाजपवर सडकून टीका केली असून त्यांचा हा अत्याचार फार काळ चालणार नाही, असं बर्वे म्हणाल्यात.
 
निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवल्यानंतर रश्मी बर्वे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे.सत्तेत बसलेले हुकूमशाही पद्धतीने राज्य करत आहेत. त्यांच्या सत्तेचा माज समोर आला आहे. त्यांना एका मागासवर्गीय महिलेची एवढी भीती आहे. मला सकाळी उशिरा सुनावणीला बोलावण्यात आली. त्यासाठी उशिरा नोटीस देण्यात आली. माझी बाजू मांडण्याची संधी न देताच माझे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, असा दावा रश्मी बर्वे यांनी केला.
 
तसेच यावेळी मी यांना घाबरणार नाही.. मी अबला नाही. महिला दुर्गेचे रुप असते. मी महिषासुराचा नाश करेन. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे तुम्ही कोण. हे बेटी बचाव, बेटी पढावच्या गप्पा करतात. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे ते कोण आहेत, असा हल्लाबोलही बर्वे यांनी केला.
 
सरकार घाबरले आहे. पण आम्ही सत्याच्या मार्गाने जाऊ. आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. न्यायालयातही न्याय न मिळाल्यास हे सरकार गोरगरिबांवर अन्याय करतेय, हेच सिद्ध होईल, असेही बर्वे म्हणाल्या. मी अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेत आहे. माझ्या जात प्रमाणपत्रावर तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी केला.

Edited by -Ratnadeep Ranshoor