1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2023 (13:31 IST)

महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी तुळजापूर

श्री तुळजाभवानी तुळजापूर  मंदिरामध्ये यासंदर्भात फलक लावण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्येतेचे भान ठेवण्यासंदर्भात मंदिरामध्ये फलक लावण्यात आले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे.
 
असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आला आहे. या फलकावरून पुन्हा राज्यात वाद सुरु झाला आहे. मात्र तरीही तुळजापूर पहिली शक्तीपीठ आहे.. तर आज जाणून घेऊ मंदिर इतिहास, महत्व, व इतर सर्व माहिती.  

भारतीय पातळीवर 108 शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र तुळजापूर (tuljapur), कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत.
 
तुळजाभवानी – ऐतिहासिक पार्श्वभूमी:
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून 42 कि.मी. तर उस्मानाबादहून 22 कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची हि देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.
 
 
तुळजापूर कसे पोहोचाल?:
रस्त्याने
जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबादपासून 22.4 किमी लांब आणि लातूरपासून 77.0 किलोमीटर अंतरावर आहे.
 
महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी तुळजापूर
तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन 22 किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण 44 किमी अंतरावर आहे.
 
तुळजापूर  हे महाराष्ट्रातीलउस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात.
 
तुळजाभवानी देवी – तुळजापूर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.
 
हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे 17 व्या किंवा 18 व्या शतकातील मंदिर आहे.
 
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.
 
संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात – श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.
 
येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.
 
तुळजापुर मुख्य मंदिर (tuljapur)
मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही.
 
पायर्‍या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे.
 
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कडेय ‍ऋषींचे मंदिर आहे. तसेच पायर्‍या उतरत खाली गेल्यास तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर यज्ञकुंड आहे.
 
तुळजापुर मंदिराचे वैशिष्ट्य
देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्‍या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत.
 
तुळजापुर (tuljapur) इतिहास मूळ नाव चिंचपूर
तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीचं ठाणं असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. प्राचीन काळी तुळजापुरात मोठय़ा प्रमाणावर चिंचेची झाडं असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मीळ झालं आहे.
 
निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजाअर्चा कदम घराण्यातील 16 घरांकडे आहे. यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस-सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. त्यांच्यासोबत पानेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरिता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात. महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवर मतभेद वाढत गेल्याने हैद्राबाद संस्थानमधील धार्मिक विभागाने 1919 साली
 
‘देऊळ-ए-कवायत’ नावाचा कायदावजा करार केला. त्यानुसार संस्थानसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसेच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आलेा असल्याने आजही मंदिराचा कारभार ‘देऊळ-ए-कवायत’ नुसारच चालविला जातो.

तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणूनघेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपण आहे.
 
तुळजापुरात कदम, मलबा, परमेश्वर, उदाजी, सोंजी याप्रमाणे भोपे पुजारी तर भोसले, मगर, क्षीरसागर, गंगणे, रोचकरी यांसारख्या नावाचे पाळीकर पुजारी एकमेकांचे पाहुणे असले तरी आजतागायत भोपे पुजाऱ्यांनी आपल्या मुलीचा विवाह गावातील तरुणाशी केलेला नाही.

मंदिर संस्थान आणि संस्थानकडून दानपेटीतील 16 टक्के हिस्सा मिळविणारे भोपे पुजारी असले तरी देवीचे अनेक पारंपरिक सेवेकरी विनामोबदला सेवा देतात. भक्ताला लाखोने देणारी देवी स्वत: मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते.
 
गेल्या अनेक दशकांपासून उपरकर हा नैवेद्य देतात. याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यांसारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात.
 
देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत. शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात. सरकारी नियंत्रणाखाली असणाऱ्या मंदिराची चावी पानेरी मठाकडे असते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते. देवीचे दागिने जवाहरखान्यात ने-आणण्याची जबाबदारी मळेकर मठावर आहे. ट्रस्ट असले तरी या खासगी सेवा अखंड आहेत.
 
दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्येशिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.
 
तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरविणारे तांबोळी मुस्लीम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच शिवाय घटस्थापनाही करतात. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत.
 
तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार! त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. एका भक्ताच्या घराण्याची प्रथा तर अशी आहे की, चक्क बोंबलत जाऊन दर्शन घ्यावे लागते. एक दंतकथा अशी सांगितली जाते की मौजे रांजणी ता. घनसांगवी जि. जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत होऊन भीतीने तो ओरडतच घराबाहेर पडला.
 
त्याच्या आवाजाने सर्व जण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले. परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत बोंब ठोकतच गेला. देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलतच जाण्याची परंपरा निर्माण झाली. त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले! विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधीसुद्धा आहे.
 
अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासीयांनी जपल्या आहेत. देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते. ही परंपरा आजही जोपासली जाते. काळभैरव रखवालदार आहे.
 
तो वर्षांतून एकदा अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पण या भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते.
 
त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात. अश्विन अमावस्येला भेंडोळीबरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते.
 
या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो, तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथापरंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही. हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकचुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे.
 
श्रीतुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाणपरंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथापरंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहानथोर एकच जयघोष करतात. ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ!’
 
तुळजापूर (tuljapur) देवीचे उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात . या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक-भक्त तुळजापूर ला येतात.
 
शाकंभरी नवरात्र
हा उत्सव श्री देवीचा शाकंभरी नवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो . या उत्सव मध्ये घटस्थपना करण्यात येते ,होमहवन ,जलयात्रा , अन्नदान , आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात . श्री देवीस अलंकार पुजा करण्यात येतात या उत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक देवीच्या दर्शनास येतात. हा उत्सव स्थनिक लोकांसाठी महत्वाचा आहे.
 
दसरा उत्सव
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
 
काळभैरव भेंडोळी उत्सव
काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात .
 
श्री तुळजाभवानी (tuljapur) मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो
 
शिवरायांची कुलदेवता शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याचे मूळ राजस्थानातील चित्तोड येथील शिसोदिया वंशाचे मानले जाते.
शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याचे मूळ राजस्थानातील चित्तोड येथील शिसोदिया वंशाचे मानले जाते. तिथे कालिकादेवीच्या प्राचीन मंदिराबरोबरच १६ व्या शतकात बांधण्यात आलेले श्रीतुळजाभवानीचे अतिशय भव्य असे मंदिरही आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांचे नाते अतूट आहे हे अनेक संदर्भातून स्पष्ट झालेले आहे. खरंतर छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेल्या सह्यद्रीच्या परिसरातून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर अतिशय जवळ असताना राजांनी श्रीतुळजाभवानीची आराधना करावी हे वरकरणी वेगळे वाटत असले तरी अभ्यासांती, असे स्पष्ट होते की श्रीतुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवता आहे. का नसेल? महिषमर्दिनी रूपातील ती वीरांची देवता आहे. छत्रपतींच्या भोसले घराण्याचे मूळ राजस्थानातील चित्तोड येथील शिसोदिया वंशाचे मानले जाते. आठव्या शतकात बांधलेल्या चित्तोडवर कालिकादेवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवाय चित्तोड किल्ल्यावर १६ व्या शतकात बांधण्यात आलेले श्रीतुळजाभवानीचे मंदिरही अतिशय भव्य आहे.
 
धार्मिक माहिती 
कृतयुगाच्या वेळी ‘कर्दम’ ऋषींची पत्‍नी ‘अनुभूती’ हिच्याबद्दल ‘कुंकुर’ नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्‍न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती.
 
या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. (उल्लेख केव्हा, कोठे केला आहे?) भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणार्‍या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरीपर्यंत चालतो.
 
तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर इ.स. १३९८ चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे.
 
तुळजा भवानीचे पुराणातील उल्लेख (tuljapur)
तुळजाभवानीबाबत पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुरानाचाच एक भाग आहे. याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवनीचे महत्व सांगण्यात आले आहे. तुळजाभवानीबद्दल पुढील अख्यायिका प्रसिद्ध आहे. स्कंध पुराणात देवीची अवतारकथा वर्णन करण्यात आली आहे.
 
कृत युगात कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती एका मुलासह राहत असत. अनुभूती ही रतीप्रमाणेच सुंदर आणि सुशील होती. कर्दम ऋषीच्या निधनानंतर तिने सती जाण्याचे ठरविले मात्र तेवढात आकाशवाणी झाली. लहान मुल असल्यामुळे सती जाण्याची गरज नाही असे आकाशवाणीत सांगण्यात आले. यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय रद्द करीत मंदाकिनी नदीच्या काठी लहान मुलाला घेऊन तपश्चर्येला सुरुवात केली. यावेळी कुकूर नावाच्या राक्षसाची वाईट नजर तिच्यावर पडली.
.
 


Edited By - Ratnadeep ranshoor