शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

महादेवाची जागा

- डॉ. उषा गडकरी

WD
भारतीय परंपरेत तेहतीस कोटी देवांना मान्यता दिली आहे. हे सर्वविदित आहे. या देवांमधला सगळ्यात सोपा देव म्हणजे महादेव होय. शंकराला-महादेवाला साधा भोळा देव आणि साध्या भोळ्यांचा देव असेही संबोधले जाते. थोड्याश भक्तीने पावणारा, भक्ताच्या आर्त हाकेला चटकन 'ओ' देणारा देव म्हणजे महादेव, अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु याच कारणामुळे हा देव कित्येकदा मोठ्या अडचणीत सापडतो. असंख्य देवांपैकी भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा महादेवासमोर लागलेल्या दिसतात. कोणी एखादे बेलाचे पान वाहनू, त्याला नोकरी लवून दे म्हणतो तर कोंणी पांढरे फूल वाहून पटकनलग्न जमू दे म्हणतो. कधी कधी तर परस्पर विरोधी मागण्या करणारे भक्तही समोर उभे राहतात. एकजण 'अ' ची बदली दुरसीकडे कर म्हणतो तर, त्याच्याच पाठीमागचा 'अ' ची बदली मुळीच करू नको म्हणतो. या सर्व गोष्टींमुळे हा भोळा सांब पार वैतागून गेला.

कुठे जावे, कुठे लपावे म्हणजे भक्तांचा ससेमिरा पाठीमागे लागणार नाही, याचा तो विचार करू लागला. हिमालयात गौरीशंकर जाऊन पाहिले परंतु तेथेही भक्तांनी पिच्छा सोडला नही. विराण-वैराण स्मशनात वास्तव्य करून पाहिले पण तेथेही भक्त येऊन पोहोचलेच. शेवटी तो भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणू लागला, देवा! कसेही करून मला अशी जागा दाखव की, जेथे माझे तथाकथित भक्त पोहोचू शकणार नाही, विष्णूंनी थोडा विचार केला आणि शंकराला एक नामी सल्ला दिला. श्री विष्णू म्हणाले, 'तू माणसाच्या हृदयात खोल लपून रहा. ही माणसे बाहेरच्याच बारा भानगडीत इतकी गुंतली आहेत की, त्यांना आपल्या आत डोकावून पाहण्याची अजिबात फुरसद नाही. तू वर्षानुवर्षे या हृदय-गाभार्‍यात निवांत पडून रहा.' शंकराने तात्काळ हा सल्ला मानला. तेव्हापासून परमेश्वराने माणसाचे हृदय आपले घर केले आहे. त्यांच्या निकट इतका मोठा ठेवा असूनही ते त्याकडे ढुंकूनही पहात नाहीत. 'तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी' अशी त्यांची स्थिती झाली आहे.

खरोखरच आजकालचे आपले जीवन इतके धावपळीचे, धकाधकीचे आणि ताणतणावचे झाले आहे की, आपल्याला आपल्या स्वत:च्या आत डोकावून पाह्यला थोडीही सवड नाही. अतिशय बहिर्मुखी जीवन आपण व्यतीत करीत आहोत. बाह्य व्याप आटोपल्यानंतर आपण स्वत:कडे लक्ष देतो, परंतु तेही अगदी वरवर, केवळ बाह्यांगापुरते. आपण आपलेच ‍प्रतिबिंब आरशात चारचारदा पाहतो. परंतु आपल्या खर्‍या 'स्व'कडे एकदाही नजर टाकीत नाही.

आपल्या देहाशी सहजपणे निगडीत असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला श्वास. परंतु तोही आपण अगदी गृहीत धरलेला असतो. विशेष कारणाने आपला श्वास घुसमटला किंवा श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला तरच आपले श्वासाकडे लक्ष जाते. आपला श्वास म्हणजे वास्तविक आपला प्राण होय, अस्तित्व होय. तोच वास्तविक आपला परमेश्वर होय. या श्वासाच्या लयीकडे आपण नीट लक्ष दिले तर आपल्या शरीरातला अणुरेणू या अस्तित्वाने, चैतन्याने भारला जातो. त्याच्यात जणू नवप्राण संचारतात. शरीरातील अ‍शुद्धता निघून जाण्याची प्रक्रिया सुरू होते. येणारा श्वास, जाणारा श्वास ‍आणि त्यावरील आपले अवधान म्हणजे जणू अजपा जपच होय. प्रत्येक श्वास साक्षात त्या अंतस्थ परमेश्वराशी जोडला जातो आणि आपल्या साडे-तीन हातांच्या शरीरात प्रसन्नतेची, आल्हादाची कारंजी फुटू लागातात. अक्षय आनंद-सरिता आत दुथडी भरून वहात असते. परंतु आपण बाहेरच्या कोलाहलात अडकलेले असतो. या सरितेचा खळखळाट आपल्या कानापर्यंत पोहाचतच नाही. भरगंगेत अवगाहन करूनही आपण कोरडेच राहतो.

या आनंदसागरात आकंठ डुंबायचे असेल तर आपल्याकडून अत्यल्प योगदानाची अपेक्षा असते. तुम्ही चिमूटभर दिले तरी ते परमतत्त्व पसाभर तुमच्या पदरात टाकल्याशिवाय रहात नाही. कणभराचे मणभर करण्याचे त्याच्यात सामर्थ्य असते.

या संदर्भात एका राजची गोष्ट मोठी अन्वर्थक ठरेल. लागोपाठ तीन वर्षे राज्यात दुष्काळ पडला. राजा प्रजाहितदक्ष होता. तीनही वर्षे मोठ्या कौशल्याने निभवली. परंतु जेव्हा चौथ्या वर्षीही अवर्षण झाले तेव्हा मात्र सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. गावाबाहेरच्या महादेवाचा गाभारा दुधाने भरून टाकवा आणि देवाची करूणा भाकावी असे ठरले.

सर्वांनी वाटी वाटी दूध गाभार्‍यात टाकण्यचे फर्मान निघाले. दुधाच्या ऐवजी सर्वांनी वाटी वाटी पाणीच गाभार्‍यात टाकले. प्रत्येकाला वाटले दुसरा दूध टाकेल आपण पाणी टाकल्याने काही बिघडणार नाही. बारा वाजता एक म्हातारी आली तिने मात्र आपल्या वाटणीचे दूध प्रामाणिकपणे गाभार्‍यात टाकले आणि क्षणात पाण्याचा रंग बदलला. शंकर तर अल्पसंतोषी देव म्हणून प्रसिद्धच आहे. म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळे तो प्रसन्न झाला. आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केला, आणि परमेश्वरी ममता चहुअंगाने बरसू लागली. मूसळधार पाऊस पडला.

आपल्या हृदयस्थ परमेश्वरा ला साक्षी ठेवून केलेली लहानशीही कृती परमेश्वराच्या चरणी कशी रुजू होते, याचा साक्षात वस्तुपाठच सगळ्यांनी अनुभवला म्हणून बाह्यचर्मचक्षू बंद करून अंत:र्चक्षूंना साक्षी ठेवून त्या हृदयस्थ चैतन्यरूपी
WD
परमेश्वराच्या दिशेने एक जरी पाऊल टाकले, तरी तो आपल्या दिशेने दहा पावलं टाकल्याशिवाय रहात नाही. महादेव, भोळासांब, असला तरी भावाचा भुकेला आहे. भक्तजण जर आपल्या छोट्या क्षुद्र इच्छा पूर्ण होण्यासाठीच फक्त त्याला बेलफूल वहात असतील, तर त्याला भक्तांपासून दूर कुठेतरी पळून जावेसे वाटणे साहजिकच आहे. आपल्या जवळ असणारा ठेवा आपल्या जवळच ठेवण्याची किल्ली त्याने कधीच आपल्या सुपूर्द केली आहे. ती योग्य वेळी योग्य ठिकाणी लावण्याची दक्षता फक्त आपण घेतली म्हणजे झाले.