1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (20:59 IST)

सरकारला ४० दिवसांची मुदत मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकले

maratha aarakshan manoj
जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. सरकारला आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र, ४० व्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
 
दरम्यान जालना येथील अंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, कायदेशीर लढाई म्हणून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अजिबात होणार नाही. आता आम्हाला वेठीस धरू नका. तसेच ६५ लाख अभिलेखांपैकी ५ हजार कुणबी नोंदी सापडल्या असतील तर, आरक्षण देण्यासाठी त्या अभिलेखांचे पुरावे भरपूर झाले आहेत. तसेच आता सरकारला पुरावे सापडलेत, आम्ही वेळही दिलाय.
 
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे ते आता सरकारने ठरवले पाहिजे. पण ४० व्या दिवशी आम्हाला आरक्षण लागते, बाकीची कारणे सांगू नयेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
खरं तर समिती आम्ही नको म्हटलो होतो, तरी सरकारने आमचे ऐकले नाही. आता आमच्यावेळी कायदेशीर अडचणी कशा येतील? असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीररीत्या येऊन गेलेत.