शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

...म्हणे आत्मे अपघात घडवतात!

WD
श्रध्‍दा- अंधश्रद्धाच्या या भागात आज मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावर असणार्‍या मानपूर घाटाचा प्रवास करू या. हा घाट शापित असल्याचे बोलले जाते. या रस्त्यावरून नेहमी प्रवास करणार्‍या वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार या घाटात अतृप्त आत्मे भटकत असतात. त्यामुळेच अपघात घडतात. यात खरे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तेथे पोहोचलो.

हा घाट बराच वळणदार आणि धोकादायक असल्याचे आमच्या लक्षात आले. थोडे लांब गेल्यानंतर भैरूबाबाचे मंदिर आमच्या दृष्टीस पडले. येथून जाणारा प्रत्येक वाहन चालक मंदिरासमोर थांबून नमस्कार करीत होता.

WD
गाडीतून उतरून पूजा केलेल्या पप्पू मालवीय या ट्रक चालकाशी आम्ही बोललो. मालवीय गेल्या काही वर्षापासून याच मार्गावर ट्रक चालवीत आहेत. त्यांनी या घाटात बरेच अपघात पाहिले. ते पाहूनच तो भैरूबाबाचा भक्त बनला आहे. या घाटात आत्मे भटकतात यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. पण भैरूबाबाच्या आशीर्वादाने आपल्याला कोणताही अपघात झालेला नाही, असेही त्याने सांगितले.

घाटावर जागोजागी इशारा देणारे साइन बोर्ड लावलेले आहेत. हा घाट धोकादायक असून वेळोवेळी ब्रेक चेक करा, वळणांवर सावधगिरी बाळगा, असे इशारे त्यावर देण्यात आले आहेत.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....

WD
या घाटातील वाहतुकीचे निरिक्षण केल्यानंतर बरेच वाहन चालक धोकादायक वळणांवरून जाताना वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवत नाहीत, असे लक्षात आले. पण तरीही वाहन चालकांच्या मते अपघाताचे कारण भटकणारे आत्मे हेच आहे. भैरूबाबाचा एक अन्य भक्त ट्रक चालक विष्णूप्रसाद गोस्वामी सागंतात, 'हे मंदिर बर्‍याच वर्षापासून आहे. बाबांसमोर नतमस्तक होणारे सुरक्षित राहतात मात्र त्यांचा अनादर करणार्‍यांचे अहित होते.'

पण सर्व वाहन चालक असा विचार करतात असे नाही. मंदिरात येणारे अनेकजण भूत-प्रेत यांना मानत नाहीत. केवळ श्रद्धा म्हणून ते गाडी मंदिरासमोर आली की नमस्कार करतात. तेथून परतत असताना मानपूर घाटात एक ट्रक उलटलेला नजरेस पडला. ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालेला होता. या दुर्घटनेचा शोध घेणार्‍या पोलिसांच्या मते, येथे अशा दुर्घटना नेहमीच घडत असतात. मानपूर घाटातील वळणे धोकादायक आहेत. थोडीशीही चूक दुर्घटनेस कारणीभूत ठरते. त्यामुळे तेथून जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटते? ते आम्हाला जरूर कळवा.