शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2016 (17:21 IST)

कांद्याची भाव पडले तर शेतकरी अडचणीत मात्र सामन्य बाजारात कांदा स्वस्त

देशातील सर्वात मोठी असलेल्या आणि पूर्ण देशातील कांद्याचे भा ठरवत असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  लाल कांद्याची आवक वाढत असल्याने दरात घसरण झाली आहे.मंगळवारी लाल कांदा 800 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला. मागील आठवड्याच्या तुलनेने लाल।कांद्याच्या दरात 500 रुपयांची घसरण दिसून आली.या घसरणीचा फटका मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्याला बसत आहे.
 
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या गोंधळातून अजूनही शेतकरी बाहेर पडलेला नाही तोच कांदा दरात घसरण सुरू आहे. त्यामुळे  आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहे. 
उन्हाळ कांद्याला पूर्वीपासूनच दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची नामुष्की आली होती. लाल कांद्याला दर मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने आठशे रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. 
 
सरकार पातळीवर कृषिमाल नियमन मुक्तीपासून अनुदान आणि विम्यापर्यंतचे निर्णय घेतले गेले. परंतु, कांद्याच्या गडगडणाऱ्या भावात मात्र फरक पडलेला नाही. पहिलेच उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांना रडवले. त्यानंतर आता नव्या लाल कांद्याबाबत अशीच स्थिती आहे. हंगामाच्या सुरुवातीला त्याचे भाव प्रति क्विंटलला ५०० रुपयांनी घसरणे हे त्याचे निदर्शक. येत्या काळात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढणार आहे. तेव्हा रोकडअभावी थंडावलेल्या बाजारात भावाची  स्थिती आणखी कोसळण्याची शक्यता आहे.
 
कांदा भावातील चढ-उतार तशी नवीन नाही. कधी उत्पादनामुळे तर कधी व्यापारी व शासनाच्या धोरणामुळे त्याचे भाव नेहमीच अस्थिर राहतात. निसर्गाचा फटका बसतो तो वेगळाच. या प्रक्रियेत कांदा दरावर प्रभाव पाडणारे घटक वेगवेगळे असले तरी परिणाम होणारा घटक मात्र एकमेव कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होतो.
मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्च भरून निघणे अवघड आहे. प्रति क्विंटल कांद्याचा उत्पादन खर्च जवळपास एक हजार रुपये आहे. यामुळे नफा दूरच, उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकावर पुन्हा संकट कोसळले आहे.
 
येणाऱ्या काळात नवीन कांद्याची आवक वाढणार आहे. तत्पूर्वीच त्याचे भाव उन्हाळ कांद्याप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत. या कांद्याचे आयुर्मान कमी असल्याने तो साठवता येत नाही. शेतातून काढल्यावर आहे त्या भावात विकण्याशिवाय गत्यंतर नसते. परिणामी, एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात येणार असल्याने भाव सुधारण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत नवीन कांदा पुन्हा शेतकऱ्यांनाच रडवणार असल्याचे चित्र आहे.