रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

गुमनाम है कोई !, शिल्पा नवलकर यांचे पठडीबाहेरचे लेखन

माणसाचे मन कधी कुणाला कळत नाही. कधी कोणाचे मन बदलेल आणि माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही. हे सर्व मनाचे खेळ असतात. एखादी घटना, प्रसंगामुळे आघात झाला तर मन आणि माणसाची वागणूक बदलू देखील शकते. यावर आधारित पुढील जीवनप्रवास सुरू होतो. अशीच काहीशी गोष्ट साध्य झालीय गुमनाम है कोई ! या नाटकाच्या बाबतीत. प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून या नाटकाची संहिता आकारास आली आहे. भद्रकाली प्राँडक्शनची ही ५७ वी नाट्यकृती आहे. या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून अंगद म्हसकर ,शैला काणेकर, प्राजक्ता दातार-गुणपुले,रोहित फाळके आणि मधुरा वेलणकर या नाटकात दिसतील. या नाटकाचा शुभारंभ आज २२ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
 
नाटकाविषयी शिल्पा नवलकर सांगतात की, ' खरंतर भद्रकाली सारख्या संस्थेसोबत काम करताना वेगळी मजा आहे. सेल्फीनंतर देखील बरचं लिखाण केलं. पण त्या दरम्यान नाटक देखील पुन्हा लिहावं हे डोक्यात होतच. हा एक सायको ड्रामा आहे. त्यामुळे पहिला अंक लिहल्यावर काही महिन्यानंतर मग दुसरा अंक लिहला. हे नाटक सेल्फी नाटकापेक्षा वेगळं असावं हे मनात पक्क होतं. लेखकाच्या मनात आणि डोक्यात एखादा विषय पक्का असला की कोणतेही लेखन करायला वेळ लागतं नाही. तरी साधारण एक वर्ष तरी हे नाटक लिहायला लागला असेल.
 
गुमनाम है कोई! या नाटकातील व्यक्तिरेखेविषयी त्या सांगतात की, " हे नाटक लेखिकेच्या मनावर अचानकपणे आघात झाल्यावर तिचं झालेलं विचित्र वागणं यावर आधारित आहे.त्यात रेवती कारखानीस ही भूमिका मधुरा वेलणकर हीने साकारली आहे.खरंतर मी आणि मधुरा अगदी जुन्या मैत्रिणी असलो तरी मला मधुरा खरी अभिनेत्री आहे हे या नाटकातून जाणवतं आहे. ही व्यक्तिरेखा तिला चांगलीच जमून आली आहे. त्यातील सूर तिने उत्तम पकडला आहे ". 
 
पठडीत न बसणाऱ्या नाटकाचे मालिकेचे,पटकथाचे  लिखाण म्हटले की अभिनेत्री- लेखिका शिल्पा नवलकर लगेच समोर येतात. वेगळा विषय, वेगळी मांडणी, प्रेक्षकांना लिखाणातून दिला जाणारा सामाजिक संदेश ही त्यांच्या लिखाणाची खासियत. हीच खासियत पुन्हा एकदा गुमनाम है कोई! या नाटकातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नाटकाचा शुभारंभ आज २२ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.