शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (12:04 IST)

कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर)

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक, व समीक्षक होते. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्राच्या पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन असे झाले. 
 
यांचे वडील वकील होते. यांना सहा भाऊ आणि एक कुसुम नावाची बहीण होती. लाडाची असल्यामुळे त्यांनी कुसुम चे अग्रज (थोरले) असल्याने आपले टोपण नाव "कुसुमाग्रज" ठेवले. 
 
नाशिकमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये भूमिका केली. चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. सत्याग्रहातही यांनी भाग घेतला. त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. तत्पश्चात ते मुंबईला आले त्यांना तिथे मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव यांची भेट घेतली. त्यांनी ह्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. कवी असलेले कुसुमाग्रज यशस्वी नाटककार झाले. त्यांनी आपल्या लेखणी मधून सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कठोर टीका केली. 
 
त्यांचे साहित्यिक विचार लौकिकतावादी आहे. ते आत्मनिष्ठ व समाज निष्ठा जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. कविता, नाटक, कादंबऱ्या, कथा, लघु निबंध इत्यादी प्रकाराचे साहित्य त्यांनी हाताळले. त्यांचे काही नावाजलेले साहित्य काव्य संग्रह- जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा. नाटक- दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट,. कादंबऱ्या - वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर.
 
वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचे निधन 10 मार्च 1999 रोजी झाले. वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
 
त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यासाठी शाळेमध्ये निबंध, भाषण, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच अनेक संस्था पण लोकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि समजविण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करतात.