मी तिरंगा बोलतोय
प्रिय भारतवासीयांनो,
यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला.
|

