गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Updated : बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (16:04 IST)

पिठलं

besan bhakar
आई .....!
काय करणार आहे जेवायला? 
काहीतरी मस्त कर ना! 
मुलाची फर्माईश.
पण मला आज अगदी आतून पिठलं खावसं वाटत होतं.
मी काहीच बोलले नाही, भाकरीच्या पिठात गरम पाणी टाकून झाकून ठेवलं आणि कांदा चिरायला घेतला.
उत्तर मिळालं नाही म्हणून मुलगा स्वयंपाक घरात माझ्यामागे येऊन उभा राहिला.
ए आई, सांगना,...काय करतेस जेवायला?
त्याचा लाडिक प्रश्न. मी पण एकदम गोड हसले आणि त्याच्याकडे बघून म्हणाले, "अरे आज ना...माझ्या आवडीचं पिठलं-भाकरी".
 
तसा त्याचा चेहरा एकदम बदलला आणि मला हसू आलं.
 "नाही ! 
पिठलं बिठलं नको..., 
भाकरी ठीके पिठलंss काय?
लगेच दुसरे ऑप्शनस द्यायला सुरुवात झाली.
दाण्याचा कूट घातलेली भाजी चालेल, शेंगदाण्याची चटणी चालेल, किंवा चटणी पण चालेल पण पिठलंs नको याssर!"
 
मी शांतपणे म्हणाले,"
अरे रोज तुमच्या सगळ्यांच्या आवडीच असतं ना..., 
मग आज माझ्या आवडीचं..."
"पण आमच्या आवडीच तुला पण आवडतं ना...."
नको ना पिठलं.... 
दुसर काहीतरी प्लीssज.
त्याने खूपच आर्जव केला..., 
पण मला मात्र आज पिठलं खावसं वाटत होतं. 
कित्येक महिने झाले होते; 
त्याची भुणभुण सुरू होती.
मी त्याला म्हटलं,
"अरे, आज ना मला तुझ्या आज्जीची म्हणजे माझ्या आईची खूप आठवण येत आहे, 
ती ना..., खास मला आवडतं म्हणून, हिरव्या मिरचीचं, लसणाच्या फोडणीचं, भरपूर कोथिंबीर 
घातलेलं पिवळ बनवत असे. 
तुझ्या मामाला आणि मावशीला ते अजिबात आवडायचं नाही, 
पण मी शेंडेफळ म्हणून माझ्यासाठी ती ते खूप आवडीने करायची 
आणि एक सांगू तुला आता, 

आजीला जाऊन आज बारा वर्षे झाली, ती गेली तेव्हा तू फक्त पाच वर्षाचा होतास, ती गेल्यावर माझ्या दोघी मावश्या मामाकडे राहिल्या. आपणही तिथेच होतो. घरी अनेक नातेवाईक होते, तेव्हा एकदा जेवायला दादांनी सांगितलं म्हणून पिवळ्या पिठलं केलं.
 
मी तेव्हा म्हणाले होते, पिठलं करायचं तर लाल मिरची घालते, तर दादा लगेच म्हणाले, " नाही, नाही! 
हिरव्या मिरचीचच कर... तुझ्या आईला हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण, वर कोथिंबीर घालूनच पिठलं आवडायचं!" 
 
मी स्तब्धच झाले...डोळ्यात टचकन पाणी आलं आणि जाणवलं, आपल्याला आईची साधी आवड ही कधीच आपल्या लक्षात आली नाही...
 
तिने ही तिच्या आवडी-निवडी, कधी बोलूनही दाखवल्या नाहीत. मोठा उसासा सोडत डोळ्यातलं पाणी पुसत मी भानावर आले.
 
मुलगा माझ्याकडे एकटक बघतच राहिला.
मी हसले आणि म्हणाले करू ना रे राजा माझ्या आवडीचं पिवळ पिठलं!?
तसं तो हो म्हणाला, 
आणि काहीही कुरकुर न करता बेडरूममध्ये निघून गेला... 
मला तो अचानक समजूतदार झाल्यासारखा वाटला. आणि वाटलं आमच्या आईनेही तिच्या भावना, अशा तिला आवडणारे पदार्थ, आवडणाऱ्या गोष्टी बोलल्या असत्या तर..... किती आनंद तिला देता आला असता.....

आज तिच्या आठवणीत, तिच्या आवडीचे पदार्थ बनवतांना डोळे भरून आले.
 
जेवायला बसल्यावर पान वाढली आणि पहिला पिठलं-भाकरीचा घास तोंडात टाकला, आणि डोळे मिटले...मी पुन्हा भावूक होईल हे लक्षात येताच माझ्या मुलाने लगेच सगळ्यांना सांगितले अरे असे खास, चवदार पिठले ना, आपल्या डोंबिवलीच्या आजी ला खूप आवडायच... आणि आपल्या मम्मीला ही आवडतं म्हणून केलं आहे.. 
 
त्याने हे उघडपणे बोलताच मी डोळे उघडून हसत त्याच्याकडे पाहिले...
तेव्हा सगळेजण हो का? अरे वा! छान, मस्तच झालाय पिठलं...असे म्हणत मिटक्या मारत खाऊ लागले...
 
जेवण झाल्यावर शतपावली घालणाऱ्या लेका जवळ गेले, आणि त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत त्याला थँक्यू म्हटले.

तसा म्हणाला थँक्यू कशाला? आठवण काढून डोळ्यातलं पाणी काढण्यापेक्षा त्या आठवणी शेअर करून खुश होत राहायचं....म्हणजे मग मनावर दडपण येत नाही; मन हलक होतं आणि आठवणी गोड होतात.
 
आज तू आणि आजी, दोघी एकमेकां जवळ मन मोकळे बोलला नाही म्हणून तू कुढत आहेस, आणि तु ही तशीच वागत आहेस... त्या प्रसंगातून तरी तू लक्षात घ्यायला पाहिजे होतेस, मनात असलेलं आपल्या माणसांजवळ सहज बोलून टाकावं...म्हणजे बोलले नाही त्याची हुरहूर आणि बोलायला हवं होतं म्हणून कुढत राहणं दूर होईल... आणि मन ही मोकळे राहील.
 
"कसं बोलू? काय बोलू ? काय वाटेल? आपण अशा काही गोष्टींचे उगाच दडपण घेतो...आता ते सोडून दे आणि अगदी मन मोकळी राहा.
 
"हो रे ! मला खरंच हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल."माझी आई म्हणायची, पातळ पिठलं कसं ताटभर धावत असतं... तसं कधी तरी मनाला पण मोकळे सोडून दिले पाहिजे. जेवणात आवडीच्या पदार्थासाठी किरकिर करणारा माझा मुलगा कधी एवढा विचारी, समजदार झाला... माझं मलाच कळलं नाही, साधं पिठल काय आणि केवढं मन मोकळं झालं, खूप शांत वाटत होत.
 
- सोशल मीडिया