एके दिवशी राजूचे आई-बाबा त्याचा गृहपाठ घेत होते. राजूला त्याच्या बाबांनी विचारले, 'बेटा, तुला विज्ञान कोण शिकवतं?' त्यावर राजूने चटकन उत्तर दिले, 'तोच टकलू!' मग आईने विचारले, 'तुला इंग्रजी कोण शिकवतं?' तेव्हाही राजूने त्याच सूरात 'ती जाडी' असे उत्तर दिले. राजूच्या या उत्तरावर संतापलेल्या आईबाबांनी त्याला चांगले धोपटून काढले. मग आई बाबा त्याच्या बालपणात हरवून गेले.
राजूची उद्धट उत्तरे ऐकल्यानंतर काळ किती बदलला याची जाणीव त्याच्या आईबाबांना झाली. विद्यार्थ्यांमधील गुरूजनांविषयी आदर कमी झाल्याचे पाहून ते खिन्न झाले. समाजात असे किती तरी आई बाबा असतील, जे त्याच्या मुलांच्या अशा उत्तरांचे कौतुक करत असतील. पण आज शिक्षकांविषयी असं बोलणारी मुले उद्या पालकांविषयी अशी बोलली तर? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे लक्षात घेतलेले बरे.