स्वामी स्वरूपानंदांना जीवनातल्या कष्टामुळे वैराग्य आले होते. त्यांनी संन्यास घेऊन साधूमार्ग स्वीकारला होता. जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान या तीन गोष्टी कशा मिळतील या शोधासाठीच त्यांनी संन्यास घेतला होता. या शोधासाठी त्यांनी कित्येक धर्मग्रंथाचे वाचन केले. वेद, पुराणाचे अध्ययन केले. या तिन्ही गोष्टींचा शोध न लागल्यामुळे त्यांचं मन चलबिचल होत होतं. कशात मन लागत नव्हत.
शेवटी त्यांनी गावापासून दूर रानामध्ये एका टेकडीवर झोपडी बांधली. तिथे राहून ते या तीन गोष्टींच्या शोधात आपला वेळ घालवीत होते. एकदा ते असेच आपली पुस्तकांनी भरलेली झोळी खांद्यावर लटकवून टेकडी चढत होते, भर उन्हाचे दिवस असल्यामुळे रणरणतं ऊन पडलं होतं. ऊन व खांद्यावरच्या ओझ्यामुळे त्यांना टेकडी चढायला त्रास होत होता. त्यांच्यामागे रानामधून लाकडाचे तुकडे वेचणारी एक मुलगी पण आपल्या तीन वर्षाच्या छोट्या भावाला झोळीमध्ये बांधून टेकडी चढत होती. ती फार दमलेली दिसत होती तरी शांतपणे टेकडी चढत होती.
स्वामीजींना जेव्हा खांद्यावरच्या पुस्तकांनी भरलेल्या झोळीच्या ओझ्यामुळे टेकडी चढायला अवघड वाटू लागलं तेव्हा त्यांनी झोळी खाली ठेवली व ती फरफटत टेकडी चढू लागले. खांद्यावरचे ओझे कमी झाल्यामुळे त्यांना बराच आराम वाटला. त्यांनी जेव्हा पहिलं की मागे येणारी मुलगी पण पाठीवरच्या ओझ्यासकट टेकडी चढत आहे, तेव्हा स्वामींना तिची दया आली. ते म्हणाले - बेटा पाठीवर घेतलेलं ओझं खाली घे. आपल्या भावाला थोडं चालायला सांग, म्हणजे माझ्यासारखा तुला पण आराम वाटेल व टेकडी चढायला सोपं जाईल.
तेव्हा ती मुलगी लगेच म्हणाली - स्वामीजी माझ्या पाठीवर ओझं कुठे आहे, हा तर माझा भाऊ आहे.
स्वामीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. खरंच ही मुलगी किती सुखी, समाधानी आहे तिच्या मनामध्ये किती शांती आहे.तिच्या मनामध्ये स्वतःला होणार्या कष्टापेक्षा आपल्या भावाला सुख मिळत आहे याचा आनंद होता.
स्वामीजींना कळलं की आपल्या कर्तव्याला हसत हसत पार पाडण्यामध्येच जीवनातील खरं सुख, शांती आणि समाधान आहे. स्वामीजींना सुख, शांती आणि समाधान या तीन गोष्टींचा उद्गम स्थानाचा शोध लागून गेला होता.