शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

'रॉ'वर खापर फोडून कातडी वाचविण्याचा प्रयत्न...

- विनोद अग्निहोत्री

मुंबईवर समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ला होणार याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली होती. मात्र हा अहवाल पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, इंटेलिजेन्स ब्युरो, नौदल व मुंबई पोलिस यांनी फाईलमध्ये दडवून ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसीस विंग अर्थात 'रॉ'ने या दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना १८ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत चार वेळा दिल्याचे पुढे आले आहे.

एवढेच नव्हे तर २९ डिसेंबरला ओबेरॉय हॉटेलमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसपीजी (स्पेशन प्रोटेक्शन ग्रुप) हॉटेलच्या फक्त दोन मजल्यांचीच तपासणी केली. तेथेच स्फोटके व शस्त्रांस्त्रांसह ठाम मांडून बसलेले अतिरेकी त्यांना दिसले नाहीत, हे अपयशही आता उघड झाले आहे.

या सगळ्या खुलाशानंतर सगळेच जण स्वतःची कातडी वाचवू पहाताहेत.रॉचे नेटवर्क देशा-परदेशात आहे. आपल्या हेरांमार्फत तसेच इलेक्ट्रॉनिक सिग्नलमार्फत रॉ माहिती मिळवते. संदेशांचे डिकोडीकरण केले जाते. त्याचा अर्थ लावून त्याची माहिती आयबी, सरकार व संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिली जाते. अर्थात, फारच कमी जणांना हा अहवाल पाठविला जातो.

रॉच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मर्यादेबाहेर जाऊन काम करण्याची मुभा रॉला नाही. त्यामुळे केवळ अशी माहिती संबंधित विभागांना पोहोचविणे एवढेच त्यांचे काम आहे.

त्यामुळे मुंबई व गेट वे ऑफ इंडियाच्या समोर समुद्राच्या दिशेने मुख्य दार असलेल्या बड्या हॉटेलवर हल्ला होणार आहे, ही माहिती रॉने संबंधितांना दिली होती. त्याव्यतिरिक्त रॉ काहीही करू शकत नाही. यापुढे सगळे काम आयबी, नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलिस व त्यांची गुन्हे शाखा यांचे होते. पण या सगळ्यांनी रॉची ही पूर्वसूचना गांभीर्याने घेतली नाही. नेहमीचेच काही तरी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले.

रॉच्या सूचनेनंतरही पंतप्रधान कार्यालयाने २९ नोव्हेंबरला ओबेरॉय हॉटेलमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजीनेही गांभीर्याने ओबेरॉयची तपासणी केली नाही. अन्यथा, त्याचवेळी दहशतवाद्यांचे भांडे फुटले असते.

एसपीजीने फक्त कार्यक्रम होणार्‍या मजल्याची आणि त्यावरच्या मजल्याची तपासणी केली. बाकी हॉटेल तपासलेच नाही. त्यामुळे दहशतवादी बचावले. आता प्रश्न असा येतो, दहशतवाद्यांनी २६ ऐवजी २९ नोव्हेंबरला हल्ला केला असता तर केवढा भयावह प्रसंग उद्भवला असता याची कल्पनाच केलेली बरी.

एका गुप्तचर अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ताजमध्ये मुख्य दारावर वाहने व सामानांची तपासणी सुरू केली गेली होती. पण ती नंतर थांबविण्यात आली. याचा अर्थ मुंबई पोलिसांनीही रॉची सूचना गांभीर्याने घेतली नाही. या सगळ्यांचेच अपयश म्हणून मुंबईवर एवढा मोठा हल्ला झाला.