मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (17:33 IST)

मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरिया डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, लेप्टो या पावसाळी आजारांच्या रुग्ण संख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट गडद होताना दिसत आहे. 
 
दरम्यान, पावसाळी आजारांमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 2020 मध्ये वर्षभरात मलेरियाचे 5007 रुग्ण आढळले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे 240 रुग्ण 8 मृत्यू, डेंग्यूचे 129 रुग्ण 3 मृत्यू आणि गॅस्ट्रोचे 2549, ‘एच1एन1’चे 44 रुग्ण आढळले होते.
 
यावर्षी 1 जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण 2318, लेप्टोचे 96, डेंग्यूचे 77, गॅस्ट्रोचे 1572 तर ‘एच1एन1’चे 28 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये लेप्टोमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही.
 
त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.