1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना फसवले, अनिल देशमुख यांचा आरोप

किसान मंचच्या यात्रेचे जोरदार स्वागत

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकरी, शेतमजुर यांना मोठी आश्वासने दिली. निवडणुकीच्या जाहिरनाम्यात सुध्दा याचा उल्लेख करण्यात आाला. यामुळे भाजपाला मोठया प्रमाणात मते मिळाली. परंतु सत्तेत येताच त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. एक प्रकारे भाजपा सरकारने शेतकरी, शेतमजुरांना फसविण्याचे काम केले आहे असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.
 

ते लोहारी सावंगा येथे किसान मंच यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मंचावर किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, शेतकरी नेते किशोर माथनकर, दत्ता पवार, राजु राउत, गोपाल खंडाते, बालु जोध यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्हयातील आर्णी तालुक्यातील दाभेडी गावात चाये पे चर्चा कार्यक्रमात उत्पादन खर्च व त्यावर पन्नास टक्के नफा या सुत्रानुसार शेतमालास हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी करुन साताबारा कोरा करुन असेही सांगीतले. याचासुध्दा त्यांना विसर पडला होता. कधी नव्हतो तो शेतकरी संपावर गेला. आम्हीसुध्दा कर्जमाफीसाठी अनेक मोर्चे काढले. शेवटी सरकारला झुकावे लागले आणि इच्छा नसतांनाही सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. आज कर्जमाफी जाहीर करुन दोन महिने झाले. परंतु अदयापही कोणत्याच शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाले नाही. निकष तत्वत: या शब्दाच्या खेळी करुन भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.