1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (09:30 IST)

Delhi Mundka Fire : दिल्लीत आगीत 27 जणांचा दुर्देवी मृत्यू,50 हून अधिक बचावले, अनेक अजूनही बेपत्ता

दिल्लीच्या मुंडका भागात एका तीनमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी (13 मे) सायंकाळी घडली.या आगीत आगीत किमान 27 जणांचा मृत्यू झाला. 50 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या 12 झाली आहे. या अपघातात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचाही मृत्यू झाला. अजूनही अनेक लोक इमारतीत अडकले आहेत. अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा शोध सुरूच आहे. 
 
सध्या या इमारतीची आग विझवण्यात प्रशासनाला यश आलं असून दिल्लीच्या संजय गांधी आणि दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत,दिल्लीचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या इमारतीतून एकूण 27 मृतदेह प्राप्त झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी NDRF चं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे.ग्रीन कॉरिडॉर करून जखमींना संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यात गुंतल्या आहेत.रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात आली मात्र अजूनही धूर आणि ढिगाऱ्यात बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. आगीच्या भक्ष्यस्थानी असलेल्या इमारतीत अडकलेल्या सुमारे 60 जणांना दोरीच्या साहाय्याने बचाव कर्मचार्‍यांनी बाहेर काढले. इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती आहे. आग विझवल्यानंतर शोधमोहीम सुरू केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. आग आटोक्यात आल्यानंतरच आगीचे नेमके कारण समजेल. दिल्ली पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेतले आहे.  एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
 
पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्वीट करताना लिहिलं, "दिल्लीत लागलेल्या भीषण आगीत अनेकांचा बळी गेल्याने मला अतीव दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मीसुद्धा सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो."

पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्वीट करत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या लोकांसाठी मदतनिधीची घोषणा केली. जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून पीएम नॅशनल रिलीफ फंडमधून प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं.
 
रामनाथ कोविंद यांनीही आगीच्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, "दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील आगीच्या या घटनेमुळे मला प्रचंड दुःख झालं आहे. कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो."