शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (08:32 IST)

उत्तरकाशी : बोगद्यात बराच काळ अडकलेल्या व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होतो?

Uttarkashi Tunnel
फैसल मोहम्मद अली
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यातून 41 कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
गेल्या 12 दिवसांपासून हे कामगार बोगद्यात अडकले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
 
या कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत काय केले पाहिजे आणि त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं हे समजून घेण्यासाठी बीबीसी हिंदीने रांची येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय कुमार मुंडा आणि रांचीच्या सरकारी कंपनीच्या खाण विभागातील डॉक्टर मनोज कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
 
डॉ. संजय कुमार मुंडा म्हणतात की, बोगद्यात अडकलेल्या लोकांमध्ये निराशेपासून गोंधळापर्यंतची परिस्थिती उद्भवू शकते, म्हणून त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांचं सर्वसमावेशक मानसशास्त्रीय मूल्यमापन केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही.
 
ते म्हणाले की, "अशा स्थितीत लोकं ऐकणे, वास घेणे किंवा पाहणे यासारख्या अनेक प्रकारच्या संवेदनांपासून वंचित होऊ लागतात. याचा पहिला परिणाम म्हणजे चिंताग्रस्त होणे. अस्वस्थता हळूहळू वाढत जाते. चांगली गोष्ट म्हणजे त्या लोकांशी सतत चर्चा सुरू आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातंय.”
 
"संवेदना हरवणे आणि चिंताग्रस्त होणे यांमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये निराशेची भावनाही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या लोकांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होत नाहीएत, हेदेखील आतमध्ये अडकलेल्या लोकांना कळतंय. यावरून त्यांच्यात किती खोलवर निराशेची भावना निर्माण होत असेल याची कल्पना करणं कठीण आहे,” असंही ते म्हणाले.
 
डॉ. संजय म्हणतात, "मला खात्री आहे की अडकलेल्या लोकांमध्ये उमेद टिकवून ठेवण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न केले जातायत. पण चिंता आणि निराशेपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीत लोकांमध्ये असणारा मानसिक गोंधळ, जो अशा परिस्थितीत आतून निर्माण होऊ शकतो. मतिभ्रम म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी दिसणे किंवा आवाज ऐकू येणे. याला भ्रमिष्ट होण्याची अवस्था असेही म्हणता येईल.
 
"अशा परिस्थितीत एखाद्याला कुटुंबातील सदस्याचा किंवा मित्राचा आवाज ऐकू येतो. मेंदूमध्ये भीतीदायक आकृत्या किंवा आवाज घुमू शकतात. हे प्रत्येकासोबत होईलंच असं नाही, परंतु काहींच्या बाबतीत असं होऊ शकतं.”
 
अशी परिस्थिती केव्हा उद्भवते हे डॉक्टर संजय स्पष्ट करतात. ते म्हणतात, “जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा असं घडतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की त्याच्याकडील स्वसंरक्षणाची सर्व साधनं संपली आहेत. अशा परिस्थितीत विचार करणं पूर्णपणे अनियंत्रित होऊ शकतं. व्यक्तीला असं वाटेल की ते त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम नाहीत."
 
पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर
बाहेर काढल्यानंतरही ही लक्षणं असतील का? या प्रश्नावर प्राध्यापक मुंडा म्हणाले की, आम्ही तुम्हाला आतापर्यंत जे काही सांगितलं ती मर्यादित काळासाठीची प्रतिक्रिया आहे. पण आत अडकल्याचा धक्का बसला की, दोन दूरगामी लक्षणं दिसू लागतात, ज्यांना मानसशास्त्रज्ञ पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीडीएस) म्हणतात.
 
ते म्हणतात, "यामध्ये ती व्यक्ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. ती व्यक्ती इथे लोकांमध्ये असली तरी तिला बोगद्यात अडकल्यासारखी परिस्थितीती जाणवेल. आणि जेव्हा त्या व्यक्तीला पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचा भास होऊ लागतो तेव्हा ती अधिक चिंताजनक बाब असते.”
 
मग मजुरांना बाहेर काढल्यानंतर मानसिक उपचाराची गरज भासू शकते का?
 
यावर ते म्हणाले, "सध्या ही आणीबाणीची परिस्थिती आहे. आराम किंवा तणाव कमी करणाऱ्या काही औषधांची गरज भासू शकते. अशा प्रकारच्या औषधांमुळे चिंता कमी होते आणि झोप लागण्यास मदत होते."
 
ते म्हणतात, “‘पीटीडीएस’ होऊ नये यासाठी सर्वसमावेशक मानसशास्त्रीय मूल्यमापन केलं पाहिजे. या घटनेमुळे किंवा कोणत्याही घटनेमुळे एखाद्या व्यक्तीच्या मेंदूवर कसा परिणाम झालाय याचं मूल्यांकन केलं जातं.”
 
"अशा परिस्थितीचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचं मूल्यमापन केल्यानंतर उपचारासाठी कोणावर कोणती पद्धत वापरायची हे ठरवता येईल."
 
शरीरावर काय परिणाम होऊ शकतो?
एका सरकारी कंपनीच्या खाण विभागातील डॉक्टर मनोज कुमार सांगतात की, जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा सर्वप्रथम त्यांची लघवी, रक्त, रक्तदाब आणि इतर गोष्टी तपासल्या जातील.
 
जेव्हा बीबीसीने विचारलं की कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं?
 
तर ते म्हणाले, “असं असू शकतं की, आत अडकलेल्या व्यक्तींना आधीच डायबिटीस किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. अशा स्थितीत त्यांचा आजार वाढू शकतो कारण वारंवार घेतलेल्या औषधांचा या आजारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा पचनशक्तीवर परिणाम होतो."
 
ते म्हणतात, जर आत अडकलेल्या लोकांना योग्य अन्न आणि पाणी मिळत नसेल तर त्याचाही परिणाम होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे आणि लघवी कमी होऊ शकते. त्याचा मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो. "अन्नाच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होऊ शकतं, ज्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात."
 
प्राध्यापक मुंडा सांगतात की, रुग्णाला तणावमुक्त करणं महत्त्वाचे आहे.
 
ते म्हणतात, "योगा हे देखील यासाठी एक साधन असू शकतं. व्यवस्थेबद्दल किंवा ज्याची कमतरता आहे त्याबद्दल राग निर्माण होतो. ते स्वीकारण्याच्या क्षमतेला चालना देणं हा देखील उपचाराचा एक भाग आहे."
 
प्राध्यापक मुंडा म्हणतात, "घटनेबद्दल कोणत्याही प्रकारची धारणा मनात न ठेवणं हा देखील मानसशास्त्रीय उपचारांचा एक भाग आहे, ज्यामध्ये व्यक्तीला त्या घटनेशी संबंधित सर्व गोष्टी सांगण्यास प्रवृत्त केलं जातं, जेणेकरून उदासिनता आणि नैराश्यापासून मुक्ती मिळू शकेल.
 
काही लोकं अशा प्रकरणांमध्ये खूप मानसिक दडपण आलं तर डॉक्टर त्यांना औषध देऊ शकतात. भीतीने ग्रासलेल्या लोकांसाठी विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत.
 
प्राध्यापक मुंडा सांगतात, "बाहेर उपस्थित असलेल्या लोकांशी विशेषत: कुटुंबाशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. आत अडकलेल्या लोकांना बचाव कार्य कसं आणि किती प्रमाणात सुरू आहे, हे देखील सांगणं महत्त्वाचं आहे. " पण या सगळ्यासोबतच त्यांना पुरेसं अन्न आणि पाणी मिळत आहे की नाही हे पाहणेही गरजेचं आहे.
 
आत अडकलेल्यांच्या कुटुंबियांवरही याचा परिणाम होत असेल, ते कोणत्या मानसिक स्थितीतून जात असतील?
 
या प्रश्नावर प्राध्यपक मुंडा म्हणाले, "सध्या सर्वांचं लक्ष आत अडकलेल्या लोकांकडे आहे. कुटुंबाचे काय हाल होत असतील याचा विचारही केला जात नाही.
 
"अनिश्चितता घातक असते, कोविडमध्ये प्रत्येकाने हे पाहिलंय”
बोगद्यात अडकलेल्या लोकांना झोपेची समस्या येऊ शकते किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या समस्या त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात का?
 
यावर डॉ. मनोज कुमार म्हणतात, "जेव्हा लोकं बोगद्यात किंवा खाणीत अडकतात, तेव्हा सगळ्यात मोठी भावना गुदमरल्यासारखी असते. यामुळे चिंता आणि अस्वस्थता निर्माण होते आणि शेवटी शरीरावर परिणाम होतो. निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. अशा लोकांना भूक न लागण्याची समस्याही जाणवू शकते.”
 
"असंही शक्य आहे की तुम्ही ज्या ठिकाणी अडकले आहात ती जागा धुळीने भरलेली असेल, तर तिथे ऑक्सिजनची कमतरता असेल. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ही सुरुवातीची लक्षणं आहेत."
 
ते म्हणाले की वेगवेगळ्या परिस्थितींचा लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो.
 
अडकण्याच्या वेळी त्या ठिकाणी ओलसरपणा असल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
"थंडीमुळे शरीरातील उष्णता कमी होऊ लागते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो आणि त्यामुळे हळूहळू इतर अवयवांवर परिणाम होतो. हायपोथर्मियामध्ये रक्त साठतं. रक्तप्रवाहात घट होते. त्यामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो.