शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (14:55 IST)

म्हणून भाजपकडून 2 मत बाद करण्याची मागणी

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून आता 2 मत बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची मतं ग्राह्य धरली जाऊ नये अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मतांची आवश्यकता आहे. अशामध्ये भाजपने मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे मविआची अडचण होऊ शकते. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी मत पत्रिका हातामध्ये नेऊन दिल्यामुळे भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांनी मतदान केलं आहे. आतापर्यंत २५० पेक्षा जास्त आमदारांचे मतदान झाले आहेत. राज्यसभेच्या ६ जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार यांची उमेदवारी धोक्यात आहे. निवडणुकीत मतदान करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर भाजप आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेत मत ग्राह्य धरु नये अशी मागणी केली आहे.
 
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. तर मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात मत पत्रिका दिली आहे. दोन्ही सदस्य मंत्री आहेत. तसेच अशा प्रकारे मतदान करण्याची पद्धत नाही. पक्ष प्रतोदांना आपण कोणाला मतदान करतो हे दाखवण्याची पद्धत आहे. परंतु मत पत्रिका कोणाच्या हातात देण्याची पद्धत नाही. त्यामुळे भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला आहे.