1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:30 IST)

मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण ओव्हरफ्लो

शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी ठिक दुपारी २.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ आणि ५ हे दोन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.
 
मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदिन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय ९७६.१० दशलक्षघन मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमीटर आहे.
 
भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमीटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमीटर आहे. भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते.