1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:21 IST)

दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती , नांदेड मलेगावसह ग्रामीण भागात उमटले आहेत. या ठिकाणी वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा थेट आरोप नाना पटोले  यांनी केला आहे.  अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा नाना पटोले  यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
 
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना  यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून  सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले. यामध्ये महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन देशभर भाजपच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. या प्रमुख मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपचे हे षडयंत्र केले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
 
तसेच हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राकारण करणे हा भाजपचा इतिहास  राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्रोशाला त्यांना तोंड देता येत नसल्याचे पटोले म्हणाले.
 
जनतेमध्ये भाजप आणि मोदी सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे.या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे.राज्यातील जनतेने भाजपचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये,
राज्यात अशांतता राखावी, असे आवाहन पटोले यांनी केले.