1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (08:48 IST)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा प्रति क्विंटल 2410 रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.
 
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसमोर जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात पुढे करते. कांद्याच्या बाबतीत मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थ‍ितीची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रथमच याबाबतीत घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.
 
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला परीस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यामुळेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor