गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (15:29 IST)

मुख्यमंत्री १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा पर्याय जाहीर करतील : टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबतचा निर्णय राज्याच्या कॅबिनेट नंतर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या बुधवारी राज्याची कॅबिनेटची बैठक आहे. या बैठकीनंतरच राज्यात कधीपासून लॉकडाऊन होणार याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच करतील असे टोपे यांनी स्पष्ट केले. टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे मत बहुतांश टास्क फोर्सच्या सदस्यांचे आहे. पण लॉकडाऊन हाच पर्याय नाही असेही काही सदस्यांनी सांगितले. राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत टास्कफोर्सच्या सदस्यांचे आहे. आज झालेल्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन झाला तर कसे सामोरे जायच ? तसेच अनेक घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे यावरही चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा पर्याय जाहीर करतील असेही टोपे म्हणाले.
 
राज्यातील सध्याची ऑक्सिजन तुटवड्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचा विचार झाल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच अंत्यविधीसाठी अधिकाधिक इलेक्ट्रिकचा पर्याय वापरण्यात येईल असेही ते म्हणाले. रेमडेसिवीर इंजेक्शनाच्या बाबतीतही येत्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात इंजेक्शन राज्यात उपलब्ध होतील. त्यासाठीच सध्या ज्यांना खूपच गरज आहे, अशाच रूग्णांना इंजेक्शन देण्याचे ठरले आहे असे टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्राने रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यात करण्याला केंद्राकडे विरोध दर्शवल्यानंतर आज केंद्रानेही ती विनंती मान्य केल्याचे टोपे म्हणाले. राज्यात उपलब्ध असणारे ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स याच्या नियोजनाच्या बाबतीतही चर्चा या बैठकीत झाली. मुख्मंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करूनच गरीबांसाठी या कालाथ काय मदत करता येईल याची चर्चा करतील असे अपेक्षित आहे. तसेच दोन दिवसांच्या चर्चेनंतर येत्या १४ एप्रिलला याबाबतचा निर्णय होईल असे अपेक्षित आहे. बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेऊनच लॉकडाऊनची घोषणा होईल असे अपेक्षित आहे.