शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (15:26 IST)

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा शब्द

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान मांडले आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहे. अशात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची पाठीशी असल्याचा शब्द दिला आहे.
 
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवा असे प्रशासनाला आदेश दिला आणि शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 
कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली असून आवश्यक सूचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.
 
नुकसानीचे पंचनामे
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा आणि महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावे असेही निर्देश दिले गेले आहेत. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
 
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाही. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
 
100 जणांना वाचवले
यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टर ने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. एनडीआरएफचे १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.