शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (21:52 IST)

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंची जीभ घसरली; एकमेकांवर पातळी सोडून टीका

girish mahajan
मुंबई – एकनाथ खडसेंच्या मुलाला नेमके काय झाले? त्याची हत्या होती की आत्महत्या? हा देखील संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या परिवाराबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यानंतर महाजनांनी केलेल्या विधानावर खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे, असे म्हणत खडसे भावूक झाले आहेत. तर, गिरीश महाजन यांना अपत्य नसल्याबद्दल खडसेंनी अयोग्य पद्धतीने शब्द वापरले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि पातळीसोडून होणारी टीका सध्या राज्यभरात चर्चेची ठरली आहे.
 
गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केंल आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय व्यक्त करणारे आहे. या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अंत्यंत वेदना झाल्या आहेत, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथ खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढले आहे, विशेष म्हणजे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून महाजन-खडसे वाद पुन्हा उफाळून आला. हा वाद प्रचंड टोकाला पोहचला असून, आता या दोन्ही नेत्यांचा वाद वैयक्तिक पातळीवर आल्याचे दिसून येत आहे. मुलाबद्दलच्या वक्तव्याने एकनाथ खडसे भावूक झाले आहेत. मला आता जास्त काही बोलायचे नाही. मला फार वेदना होत आहेत. माझ्या मित्रपरिवारातून साधारण ७० फोन हे ४ तासांत आले आहेत. त्या नागरिकांनीही गिरीश महाजन यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. आमच्या सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत.
 
गिरीश महाजनांनी अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीने अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो. आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे खडसे यांनी म्हटले. महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही खडसेंनी केली आहे. इतकेच नव्हे राजकीय द्वेषातून माणूस किती खाली जावू शकते याच हे उदाहरण म्हणजे महाजन यांचे वक्तव्य आहे. हा सत्तेचा माज आणि मस्ती असून जनता हा माज खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा देखील खडसे यांनी यावेळी महाजन यांच्यावर साधला आहे.
गेल्या चाळीस वर्षापासून मी राजकारणात आहे, मात्र एवढ्या घाणेरड्या स्तरावरच राजकारण केलं नाही. विषारी टीका करायचो, पण विचार करुन करायचो, एखादा शब्द चुकीचा बोलला गेला तर आम्ही माफी मागायचो. एवढ्या चार वर्षात राजकारणाची पातळी खूप घसरली आहे.
 
फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर गिरीश महाजन यांनी काय भानगड केली होती?
गिरीश महाजन म्हणतात की, जास्त बोलायला लावू नका. मात्र गिरीश महाजन यांना माझे आव्हान आहे, जास्त बोला आणि जे काय असेल ते दाखवा, असे आव्हान खडसे यांनी महाजन यांना केले आहे. दरम्यान, खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे. मात्र या मागचे कारण महाजन यांनाच माहिती आहे. मात्र महाजन यांनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड केली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश महाजन यांचे अनेक महिलांशी प्रेम संबंध आहेत. मात्र याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा टोला खडसे यांनी लगावला.याशिवाय खडसे म्हणाले, माझ्या चौकशी करून तुम्ही थकला आहात आता कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असा इशारा देखील खडसे यांनी दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor