गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (13:51 IST)

गोकुळाष्टमी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा असतानाही दहीहंडीवरून का रंगलंय राजकारण?

काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिलं, हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ. संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
 
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
 
मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधनं आली आहेत, पण ही बंधनं कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
 
आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मंत्री, टास्क फोर्सचे सदस्य, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस.चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी आणि गोविंदा पथकाचे सदस्य त्यावेळी उपस्थित होते.
उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू अशी भावना व्यक्त केल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं होतं.
 
पण दुसरीकडे भाजप आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेत दहीहंडी साजरा करण्याची भूमिका घेतली.
 
"सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही," असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं.
राम कदम यांनी एक व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं की, "आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?"
 
निर्बंध असले तरी मनसेसुद्धा दहीहंडी साजरा करण्यावर ठाम आहे. ठाण्यात मनसेकडून दहीहंडी साजरी करण्यासाठी तयारीही सुरू करण्यात आलीये. ठाण्यामधील भगवती मैदानावर या दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्वतः रविवारी (29 ऑगस्ट) या तयारीचा आढावा घेतला.
 
त्यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी म्हटलं की, 'सरकारनं अजूनही परवानगी द्यावी. दोन थरांचा तर हा विषय आहे आणि वीस-पंचवीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, म्हणजे आमचाही सण साजरा होईल.'
 
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनीही आम्ही दहीहंडी साजरा करणार, सरकारनं त्यासंबंधी नियमावली जाहीर करावी. आम्ही त्याचं पालन करून सण साजरा करू अशी भूमिका एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केली.
 
निर्बंध असतानाही दहीहंडी साजरी करण्यासाठी जमल्यास कारवाई केली जाईल, अशी नोटीसही पोलिसांकडून अनेक दहीहंडी मंडळांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी (31 ऑगस्ट) जन्माष्टमीला थरावर थर लागणार का हा प्रश्न आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणपतीसारख्या उत्सवांसाठी नियमावली करा, असा इशारा केंद्रानेही महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकार दहीहंडीबद्दलच्या निर्बंधांवर ठाम राहणार हे जवळपास निश्चित आहे, तर दुसरीकडे दहीहंडी साजरी करण्यावर ठाम असलेल्या भाजप-मनसेमुळे या मुद्द्याला आता राजकीय रंगही चढला आहे.
 
दहीहंडीच्या मुद्द्याचं राजकारण होऊ शकतं, याची एक झलक भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकेनंतर झालेल्या राजकीय नाट्यादरम्यानही पहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आक्रमक झालेले शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. राणेंवरील अटकेच्या कारवाईनंतर अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.
 
त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना गर्दी करण्यापासून का रोखत नाहीत? शिवसैनिकांना गर्दी करण्याची परवानगी आहे का? मग दहीहंडी उत्सवाला मनाई का करण्यात आली? अशी टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर केली गेली. त्यावेळी शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला होता.
 
अहिर यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं की, "दहीहंडी उत्सव आणि आजच्या आंदोलनाची तुलना करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांबाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले त्यासंदर्भात शिवसैनिकांनी दिलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ती नियोजित नव्हती. पण कायदा सर्वांसाठी सारखा आहे म्हणूनच पोलीसांनी शिवसैनिकांवरही लाठीचार्ज केला."
 
"दहीहंडी उत्सवात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं शक्य नाही म्हणून आपण दहीहंडी उत्सव साजरा करत नाही आहोत," असंही अहिर यांनी सांगितलं होतं.
 
काय आहे समन्वय समितीची भूमिका?
एकीकडे सरकारने कायम ठेवलेले निर्बंध आणि दुसरीकडे भाजप, मनसेची दहीहंडी साजरी करण्याबाबतची आक्रमकता यामध्ये गोविंदा पथकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधला.
अरुण पाटील यांनी म्हटलं, "मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चर्चा झाली. टास्क फोर्सकडूनही सांगण्यात आलं की, दहीहंडीमधून कोरोना संसर्ग पसरू शकतो असं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन केलं. पण बैठकीनंतर आम्ही पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पत्र दिलं. पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही निर्णय दिला नाही.
 
आम्ही त्यानंतर पुन्हा याचा पाठपुरावा केला. आम्ही हे सुद्धा म्हटलं की, दहीहंडी आम्ही पारंपरिक साजरी करताना 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेणार नाही. अगदी साध्या पध्दतीने दहीहंडी साजरी करू. पण त्यावर सरकारने अद्यापही निर्णय दिला नाही."
 
"आम्ही समन्वय समिती म्हणून कोणत्याही पथकाला दहीहंडी साजरी करा असं सांगितलं नाही. आम्ही त्यांना नियमांचे पालन करण्याचंच आवाहन केलं आहे. पण काही राजकीय पक्षांकडून दहीहंडी साजरी करणारच असं जाहीर केलं गेलय. याला राजकीय वळण लागलंय. माझी पोलीसांना विनंती आहे की जर काही पथकांकडून दहीहंडी रचण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना सांभाळून घ्यावं. तरूण मुलांवर गुन्हे दाखल करू नयेत. त्यांना आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागेल अशी कारवाई पोलीसांनी करू नये. तरूणाईचा उत्साह समजून घ्यावा," असंही अरुण पाटील यांनी म्हटलं
 
दहीहंडीवरील निर्बंधांमुळे शिवसेनेची राजकीय कोंडी?
हा दोन्ही बाजूंनी सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे, असं 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी म्हटलं.
 
"सरकारनं दहीहंडी होऊ दिली नाही, तर शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं. आणि जर दहीहंडीसारख्या सणांमधून कोरोना वाढला तर सरकार कोरोना हाताळणीत अपयशी ठरलं, असा ठपका ठेवायचा, ही विरोधी पक्षांची दुहेरी राजकीय रणनीती असते," असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
"पण मूळ मुद्दा हा आहे की, आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट पाहिलं आहे. काही राजकीय नेतेही आपण या लाटेमध्ये गमावले आहेत. तरीही राजकीय पक्षांना शहाणपण येत नाहीये. दहीहंडी, गणपतीसारख्या सणांचा धार्मिक आणि राजकीय मुद्दा केला जात आहे, हे दुर्दैव आहे," असंही प्रधान यांनी म्हटलं.
 
"केंद्र सरकार, नीती आयोग, ICMR सर्वजण तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहेत. पण भाजपचे चार केंद्रीय मंत्री गर्दी जमवून जनआशीर्वाद यात्रा करत आहेत. शिवाय प्रत्येकजण कोरोना वाढला तर दुसऱ्यामुळे अशी भूमिका घेत आहेत. म्हणजे युवासेनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार; पण भाजपच्या यात्रेमुळे कोरोना वाढला, आमच्यामुळे नाही असं म्हणत दुसऱ्याकडे बोट दाखवणार. भाजपही अशीच भूमिका घेत विरोधकांकडे बोट दाखवणार. दहीहंडीचे आयोजक अन्य धर्मियांना जबाबदार धरणार, तर इतर धर्मांचे लोक दहीहंडीसारख्या सणांवर आक्षेप घेतात. हे सर्वांत जास्त गंभीर आहे."