शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (14:57 IST)

राज्यात दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 नागरिकांचा मृत्यू

राज्यात गेल्या दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ वर्षांतील उष्माघातामुळे झालेली ही उच्चांकी नोंद आहे. आत्तापर्यंत राज्यात 374 लोकांना उष्माघाताची बाधा झाली आहे. उष्माघाताच्या वाढत्या संकटामुळे आता केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून अनेक महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. यात उष्माघातासंदर्भात राज्यांनी केंद्र सरकारच्या गाईड्लाईन्सचं पालन करावे, तसेच नॅशनल अॅक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावे, अशा दोन महत्त्वाच्या सुचना आहेत. याशिवाय आरोग्य विभागाकडूनही नागरिकांना काळजी घेत सतत पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
 
महाराष्ट्रातील विविध राज्यात 50 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात पारा दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 44 टक्के मृत्यू हे नागपूरमध्ये झालेत. नागपूरात आत्तापर्यंत 295 लोकांनी उष्माघातामुळे आपले प्राण गमावले. यातील गेल्या दोन महिन्यातील मृतांची संख्या 11 वर आहे. जळगावात 4 जणांचा बळी गेलाय. उष्माघातामुळे रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. अशा परिस्थितीत विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
 
केंद्र सरकारने जारी केलेल्या सुचनांनुसार, प्रत्येक राज्यांतील आरोग्य मंत्रालयांनी उष्माघाता संदर्भात नियमावली तयार करावी, आरोग्य सुविधा वाढवाव्यात. उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवावा. यात सलाईन, आईसपॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.