सावधान! महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, जळगाव, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी थेट रेड अलर्ट जारी केला आहे. जळगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. दुसरीकडे, विदर्भ प्रदेशातही पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढला आहे.
रेड अलर्ट: यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, जालना जिल्हे आणि पुणे-नाशिक घाटांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट: वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जारी.
यलो अलर्ट: नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी जाहीर.
हवामानशास्त्रज्ञांच्या मते, १ ऑगस्टनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्याचा जोर वाढला असून, गोंदियामध्ये वादळाने हाहाकार माजवला आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसापेक्षा सोसाट्याच्या वाऱ्याचा अधिक परिणाम जाणवत आहे. अरबी समुद्रात ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे पावसापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik
