1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (22:21 IST)

कृषी उडान योजनेत आता महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

krushi udan scheme
हरित क्रांती व नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती उत्पादनात वाढ झाली आहे. वाढलेल्या या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी शासनाने ‘कृषि उडान योजना 2.0’ सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरात शेतमालाची योग्य पद्धतीने हवाई मार्गाद्वारे जलद वाहातूकीचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकरी व शेती उत्पादक कंपन्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
 
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. सोनवणे यांनी माहिती दिली आहे. मागणी असलेल्या प्रदेशात व देशामध्ये शेत मालाचा पुरवठा करून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी शासनाने 2020 मध्ये ‘कृषि उडान योजना 2.0’ सुरू केली आहे. या योजनेची व्याप्ती लक्षात घेता केंद्र सरकारने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आपल्या देशातील ६० टक्के जनता ही केवळ शेती व्यवसायवर अवलंबून आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य दर मिळण्यासाठी शासनस्तरावर सदर हमीभाव योजना राबविण्यात येत असून विमानात आरक्षित करण्यात आलेल्या निम्या जागांकरीता अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषि उत्पादन, फलोत्पादन, मासे, दूध, दूग्धजन्य पदार्थ तसेच मांस या सारख्या व्यवसाय संबंधीची विमानाने वाहातूक करणे सोपे होणार आहे.
उत्तर पूर्व विभाग (नॉर्थ इस्ट रिजन NER), आदिवासी आणि डोगराळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा एक भाग म्हणून बागडोगरा आणि गुवाहाटी विमान तळ, लेह, श्रीनगर, नागपूर, नाशिक, रांची आणि रायपूर विमानतळावर एअरसाइड ट्रान्झिट आणि ट्रान्स- शिपमेंट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे, अशी माहिती कृषि विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.