शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (22:45 IST)

विधिमंडळाचं विशेष अधिवेशन 2-3 जुलैला, एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी

eaknath shinde
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
 
महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
 
शनिवारी (2 जुलै) शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल.
 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं," आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही.
 
राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे."
 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया"
 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
 
त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
'बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने शपथ घेतो...'
'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेत आहे....' असं म्हणत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
 
एकनाथ शिंदेंसोबतच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
आज राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. राजभवनावर राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
 
मी स्वतः मंत्रिमंडळात नसेन, बाहेरून एकनाथ शिंदेंना पाठिंबा देईल असंही देवेंद्र यांनी म्हटलं होतं.
 
पण नंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने असा निर्णय घेतला आहे की भाजपने सरकारचा भाग व्हावं. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं ट्वीट केलं.
 
पाठोपाठ भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह यांनी ट्वीट केलं.
 
मनाचा मोठेपणा दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
 
एकनाथ शिंदे यांनी या घोषणेनंतर बोलताना म्हटलं, "मी खऱ्या अर्थाने आज आम्ही जो निर्णय दिला तो राज्याचा विकास घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून जे काही आमदार आहे, जवळपास 50 आमदार आम्ही एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, एक राज्याचा विकास आणि जे काही अडीच वर्षापूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे."
 
पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट करून अभिनंदन केलं आहे.
 
ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. ते भाजप कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांचा अनुभव नवीन सरकारसाठी प्रेरणादायी असेल. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं भरीव योगदान असेल."
 
"मी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या 
 
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. ते एक जनमानसातले नेते आहेत. त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल असा विश्वास वाटतो."
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा या दोघांचं अभिनंदन केलं आहे. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करोत या सदिच्छा.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
"मुख्यमंत्री होते, पाच वर्षं त्यांनी काम केलं, विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे आश्चर्यजनक आहे. दोन्ही गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या. अंमलात येण्यासाठी कुणी नकार अथवा प्रतिक्रिया देईल असं कधी वाटलं नव्हतं. एकदा मुख्यमंत्रिपदावर गेल्यानंतर इतर पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात होती. शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो.अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि नंतर ते मंत्री होते.योगायोग असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सातारचे होते. मी मुख्यमंत्री झालो. माझं गाव सातारा जिल्ह्यातले होते. बाबासाहेब भोसले साताऱ्यातले होते. पृथ्वीराज चव्हाण तिथले होते. त्यामुळे साताऱ्याला लॉटरी लागली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एकदा मुख्यमंत्री झाला की तो राज्याचा प्रमुख होतो. मी त्यांना शुभेच्छा देतो.
 
'बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं'
पन्नास आमदार वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ, याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती, असं म्हणत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंविरोधातली नाराजी बोलून दाखवली.
 
"आमदारांनी मला समस्या सांगितल्या. आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्या निर्णयाबरोबर फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांच्याकडे 120 चं संख्याबळ आहे. मात्र मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे आभार," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
 
"ही एक ऐतिहासिक घटना आहे. जे घडलंय ते वास्तव आपल्यासमोर आहे. जी काही अपेक्षा आपल्यासमोर आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहे. आजच्या राजकारणात काय मिळेल ही अपेक्षा असते. पण ही उदारता दुर्मिळ आहे," असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं.