1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (09:26 IST)

महाराष्ट्र बंद: लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद, काय सुरू राहील, काय बंद?

Maharashtra closed: Maharashtra closed in protest of Lakhimpur Kheri
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हे पाऊल उचललं आहे.
 
9 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन 'महाराष्ट्र बंद' हाक दिली.
 
"आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत," अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.
 
"लखीमपूर खिरीत जे घडलं, ती देशाच्या संविधानाची हत्या आहे, कायद्याची पायमल्ली आहे. अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्यासाठीचं षड्यंत्र आहे. केंद्र सरकारची अमानुषता इतकी आहे की, राज्या-राज्यात ते लखीमपूर खिरीसारख्या घटना घडवतील. अशा घटनांविरोधात आम्ही आहोत," हे सांगण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पूर्ण ताकदीने या बंदमध्ये उतरू. किंबहुना, लोक स्वयंस्फूर्तीनं यात उतरतील," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच, हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, अशी खात्रीही संजय राऊतांनी बोलून दाखवली.
 
काय सुरू, काय बंद?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी 'महाराष्ट्र बंद' दरम्यान कुठल्या गोष्टी सुरू राहतील, याची माहिती दिली.
 
नवाब मलिक यांच्या माहितीनुसार, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका, दूध पुरवठा इत्यादी गोष्टींसह अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टी सुरूच राहीतल.
 
यावेळी मलिक यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, या अत्यावश्यक सेवांना कुठलीच बाधा आणायची नाही.
दुकानदारांनी या 'महाराष्ट्र बंद'ला स्वत:हून पाठिंबा दिला पाहिजे, असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं.
 
तसंच, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील की, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकानं, कामं बंद ठेवावीत, असं मलिक म्हणाले.
 
महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र बंदसोबत राहतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
 
कुणा-कुणाचा 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा?
महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी हा 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिलीय.
 
मात्र, यात महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनीही पाठिंबा जाहीर केलाय.यात आम आदमी पक्ष, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पक्ष, शेकाप, किसान सभा, कामगार संघटना, लाल निशाण पक्ष, युवक क्रांती दल, अखिल भारतीय किसान समिती यांसह इतर पक्ष आणि संघटनांचा सहभाग आहे.
काही संघटनांनी स्वत:हून 'महाराष्ट्र बंद'च्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय.
 
पुणे व्यापारी फेडरेशनच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आलं की, 11 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.
 
"आपली असोसिएशन या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी आहे. याची सर्व सभासदांनी नोंद घेऊन 11 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवावीत." असं आवाहन पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष शिरीश बोधनी यांनी केलंय.
 
महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
महाविकास आघाडीच्या 'महाराष्ट्र बंद'बाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लखीमपूरप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार कारवाई करेलच. पण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे."
"अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्‍यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्‍यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
यावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "आपण जेव्हा 'जय जवान, जय किसान' म्हणतो, तेव्हा या राज्यातला शेतकरी वेगळा, हरियाणा-पंजाबमधील शेतकरी वेगळा, असं होत नाही ना. मग राज्यातल्या भाजपनं लखीमपूर खिरीतल्या घटनेचा साधा निषेध का केला नाही? तर तसा केला नाही."
 
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार सक्षम आहे, असंही संजय राऊत म्हणाले