1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (10:22 IST)

Maharashtra News: भाजपच्या बंद दरम्यान हिंसाचारानंतर अमरावतीत तीन दिवस इंटरनेट बंद

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारी कर्फ्यू लागू करण्यात आला आणि इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुकारलेल्या कथित बंद दरम्यान शनिवारी सकाळी संतप्त जमावाने दुकानांवर दगडफेक केली, असे पोलिसांनी सांगितले. त्रिपुरातील जातीय घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती येथे मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ शनिवारी बंद पुकारण्यात आला होता.
शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला वाढवणाऱ्या अफवा पसरू नये या साठी  इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी बंद ठेवली जाईल. अमरावतीतील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक बाहेर पडले आणि अनेकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.
 
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की जमावात उपस्थित काही लोकांनी राजमकाल चौक आणि इतर ठिकाणी दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये शहरात संचारबंदी लागू केली.
 
आदेशानुसार, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही आणि कोणत्याही एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्याची परवानगी नाही. त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती, नांदेड, मालेगाव, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले, त्यादरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या. शुक्रवारी झालेल्या घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.