1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (15:42 IST)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी मविआचे विधिमंडळ सचिवांना पत्र

विधानससभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र लिहिले आहे.महाविकास आघाडीतील 39 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत. सुनिल केदार, सुरेश वरपूडकर, यांच्या सह्या या पत्रावर आहेत. विरोधी पक्षातील सदस्यांना अध्यक्षांकडून समान वागणूक मिळत नसल्याची तक्रार या नेत्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
 
'सोडून गेलेल्या नेत्यांनीच विचार करावा हे लोक आपल्याला आधार देताय की गाडताय'
 
भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत ते फक्त शिंदे गटातील मंत्र्यांवरच होत आहेत, तेव्हा शिंदे गटातील नेत्यांनीच हा विचार करावा की आपल्या हे नवे साथीदार आधार देत आहेत की गाडत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.
 
उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की गेल्या काही दिवसात फक्त शिंदे गटाच्याच नेत्यांवर आरोप होत आहेत हे लोक आधी तुमच्याच शिवसेनेत होते आता तेव्हा यावर तुम्ही काय सांगाल, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,
 
की "आम्ही सरकारमध्ये असताना हे आरोप नव्हते झाले. ज्यावेळी माझ्या मंत्रिमंडळातील नेत्यावर आरोप झाले तेव्हा मी एक राजीनामा घेतला ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आता शिंदे गटातील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. "याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टींना माझा पाठिंबा होता. आता या नेत्यांनीच विचार करायची गोष्ट आहे की आपल्याला साथ मिळत आहे की तेच लोक आपल्याला गाडत आहेत."
 
एकनाथ शिंदे यांनी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इशारा देऊ इच्छितो की तुम्ही सावध राहा. कदाचित तुमच्या संस्थेवरही हे लोक आपला दावा सांगतील."
 
दिशा सालियन प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले ज्या विषयाशी आपला काहीच संबंध नाही त्यावर भाष्य का करावे.
 
'अजितदादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवलं नाही'
आज विधानसभेमध्ये उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर शरसंधान केले.
 
विरोधी पक्षनेते अजित पवारांना ते म्हणाले की शरद पवारांनी तुम्हाला संधी असून देखील मुख्यमंत्री केले नाही. 2004 साली तुमचे आमदार जास्त होते तुम्हाला मुख्यमंत्री करण्याची संधी चालून आली होती पण त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले नाही असं फडणवीस म्हणाले.
 
याआधी अजित पवार म्हणाले होते मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही तक्रार घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे नेणार आहोत. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हे बोलण्याआधी तुम्ही सुनेत्राताईंची ( अजित पवार यांच्या पत्नी) परवानगी घेतली होती का? विदर्भातील जिल्हा बॅंकाना पुनरुज्जीवन देण्याचा विचार फडणवीस यांनी मांडला.
 
ते म्हणाले की विदर्भातील आत्महत्यांना खासगी बॅंका किंवा खासगी सावकारांमुळे आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. याला कुठेतरी चाप बसणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बॅंका हव्यात. ज्या सुविधा जिल्हा बॅंका देतात त्या खासगी बॅंका देऊ शकत नाहीत असं फडणवीस म्हणाले.
 
Published By- Priya Dixit