1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (07:35 IST)

रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? -राज ठाकरे

raj thackeray
सुडाच्या राजकारणापेक्षा बडबड करण्याचे राजकारण सुरु आहे. राजकारणात येऊ पाहणारी पिढी याकडे गंभीरपणे पाहत आहे. रोज सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर पकपक सुरु होते. यातून नवीन पिढ्या काय आदर्श घेणार? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर हे पाहून राजकारणात यायचे की नाही, याबाबत नवी पिढी संभ्रमात असल्याचेहही ते म्हणाले आहेत. 
 
पिंपरी-चिंचवड शहरात जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या वतीने शोध मराठी मनाचा या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात ठाकरे बोलत होते. त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ व्यंगयत्रिकार प्रभाकर वाईरकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी घेतली. त्यात ठाकरे यांनी व्यंगचित्रकला, तिचे भवितव्य, मुस्कटदाबी, सध्याचे राजकारण, बेरोजगारी यावर परखड मते मांडली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि यशराज पाटील यांनी ठाकरे यांचा सत्कार केला.  
 
सध्याच्या राजकीय परिस्थतीवर ठाकरे म्हणाले, ‘‘माझी २०१४ ची भाषणे काढून पहा. त्यात मी म्हटले होते की उद्या जर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर त्यांनी पहिले पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावे. एखाद्या भूमिकेला विरोध करणे राजकारणात काही गैर नाही. पण त्या माणसाने चांगली गोष्ट केली तर त्याचे अभिनंदन करण्यात मोठेपणा आणि मोकळेपणाही असावा लागतो. आजची राजकीय स्थिती एवढी लयाला गेली की हे राजकारण नव्हे. जाती -जातींमध्ये तेढ निर्माण करणं, महापुरुषांबद्दल बोलणे, कोणी कशावरही बोलायला लागले, कोणीही इतिहासतज्ज्ञ होत आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor