1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

आश्विन पौर्णिमा ज्येष्ठ अपत्याला औक्षण का करतात

aaukshan
कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी, इंद्र, ऐरावत आणि चंद्राची पूजा केली जाते. कोजागिरी म्हणजे को जागर्ति अर्थात यामध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, असे मानले जात. या रात्री लक्ष्मी येऊन जागरण करण्यांना विचारते की का जागत आहात तेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी जागत असलेले अर्थातच तिची उपासना करत असलेल्या भक्तांवर देवी प्रसन्न होते आणि त्यांच्या घरात भरभराटी येते.
 
कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात. आश्‍विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या नावांनी ओळखले जाते. आश्‍विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे म्हणतात.
 
कोजागरीच्या रात्री जागृत असणार्‍यांना अमृतप्राशनाचा लाभ मिळतो. या रात्री श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा केली जाते. 
 
या दिवशी देव आणि पितरांना पोहे आणि नारळाचे पाणी अर्पित केलं जातं आणि नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात. 
 
या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला नैवेद्य दाखवतात. नंतर नैवेद्य म्हणून दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात आयुर्वेदिक शक्तीमुळे हे दूध आरोग्यासाठी चांगलं असतं असे म्हणतात. 
 
ज्येष्ठ संततीचे औक्षण करणे किंवा ओवाळणे
हिंदु धर्मात कोणत्याही शुभ दिवशी जसे वाढदिवस, परदेश गमन करताना, परीक्षेतील यश मिळाल्यावर किंवा युद्धात विजयी झाल्यावर अशा शुभप्रसंगी व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. तसेच आश्विन पौर्णिमेला कुटुंबातील ज्येष्ठ संततीला ओवाळण्याची पद्धत आहे. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात. या दिवशी ज्येष्ठांना सुंगधित तेल लावून स्नान घातले जाते. मग संध्याकाळी पाच सवाष्णींकडून त्यांचे औक्षण केलं जातं आणि भेट वस्तू दिली जाते. ज्येष्ठ संतती नवीन पीढीची सुरुवात करणारे आणि पुढील पीढीची जबाबदारी घेणारे असातत. मग मुलगा असो वा मुलगी त्याच्यापासून कुळ पुढे वाढतं आणि ते सर्वांची काळजी घेणारे असतात, सर्व कुटुंबाचे रक्षण करणारे असतात. म्हणून त्यांना दीघार्युष्य लाभावे म्हणून औक्षण केलं जातं. औक्षणाचा दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्याच्याभोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार करतो. 
 
औक्षण कसा प्रकारे करावे जाणून घ्या-
निरांजन, कुंकु, अक्षता, अंगठी, सुपारी ठेवून असे ताट तयार करावे.
पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. 
ज्याचे औक्षण करायचे त्या व्यक्तीला पाटावर बसवावे.
त्या व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर ओले कुंकू लावावे.
कुंकुावर अक्षता लावाव्यात.
तबकातून अंगठी आणि सुपारी हातात घेऊन व्यक्तीच्या भोवती ओवाळावे.
अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाइज ओवाळण्यास आरंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यावे. 
असेच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत न्यावे. 
प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श तबकाला करावा.
असे तीनदा करावे.
व्यक्तीला निरांजन ठेवलेल्या तबकाने ओवाळावे.