मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (22:46 IST)

चिपळूणमधील महापुराचा प्राथमिक अहवाल तयार, पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला नाही

Preliminary report of floods in Chiplun prepared
राज्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातल्याचं दिसून आलं. यामध्ये  पुरग्रस्त भागांपैकी एक असलेल्या चिपळूण शहरास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता तेथील अहवाल समोर आला आहे. चिपळूणमधील  पूर हा मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती आणि कोळकेवाडी धरणातील विसर्ग यामुळेच आला असल्याचा प्राथमिक अहवाल आता पाटबंधारे विभागाने शासनाकडे सादर केला आहे. 
 
जगबुडी नदीचं पाणी वाशिष्ठी नदीला मिळालं व समुद्रात भरती असल्याने, पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने तिथे फुगवटा निर्माण झाला. त्यामुळेच चिपळूण शहरात पूर आला असल्याचं अहवालात सांगितलं गेलं आहे. याशिवाय कोळकेवाडी धरणामधूनही ८ हजार ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याची नोंद देखील या अहवालात करण्यात आलेली आहे. या अहवालात पूराची कारण व त्याबाबतच्या उपाययोजना देखील सूचवण्यात आलेल्या आहेत.
 
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे चिपळूण शहर शब्दश: जलमय झाल्याचं पहायला मिळालं. चिपळूण मुख्य बाजारपेठेत १० फूटापेक्षाही जास्त पाणी साचले होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. २६ जुलै २००५ रोजी च्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकरांनी यंदा अनुभवला असं सांगितलं जात आहे.