1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:47 IST)

पत्रकार परिषद जाहीर ऐकवली जाणार

sanjay raut shivsena
सेनाभवनबाहेर स्पीकर आणि स्क्रिनची व्यवस्था केलीय. पत्रकार परिषद जाहीर ऐकवली जाणार आहे.
 
"डोक्यावरुन पाणी गेलं असून आम्हीही आता सहन करणार नाही. आता आम्ही बरबाद करणार,"असा इशारा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
 
संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, विरोधकांनी माझी पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनाही माझी पत्रकार परिषद ऐकायली हवी.
 
ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार होत आहे. त्यांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल. या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. शिवसेना हा 11 कोटी मराठी माणसांचा आवाज, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
 
देशात कोरोनाचा संसर्ग पसरायला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार होती. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधल्या कामगारांना रेल्वेची तिकीटं काढून दिली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.
 
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.
 
"कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत हे दाखवू, असं संजय राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
 
संजय राऊत यांच्या या वक्तव्याची महाराष्ट्रात १४ फेब्रुवारीपासून चर्चा सुरू झालीय. राऊत दररोज राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. मात्र, काल त्यांनी घोषणा केलेल्या या पत्रकार परिषदेत भाजपच्या साडेतीन नेत्यांची नाव जाहीर केली जातील असं म्हटलंय.
 
या पत्रकार परिषदेबद्दल आदित्य ठाकरेंनीही सूचक उत्तर दिलंय. दरम्यान, भाजपच्या या साडेतीन नेत्यांना लवकरच कोठडीत टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे राज्याचं लक्ष शिवसेना भवनात 15 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलंय.
 
या पत्रकार परिषदेवरचं आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचीही चर्चा होतेय. त्यांना या पत्रकार परिषदेबद्दल नागपूर इथे विचारलं असता ते म्हणाले की, "सामना तर होऊ द्या, आत्ताशी टॉस झाला आहे". त्यामुळे भाजपचे मोठे नेते यात अडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. यापूर्वी राऊत यांच्या पत्नीलाही ईडीची नोटीस आली होती. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत.
 
यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंद अडसूळ यांची ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देत आहेत असं राऊत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान म्हणाले होते.
 
"माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेईन," असा इशारा संजय राऊत यांनी दिल्लीतून दिला होता.
 
मात्र, संजय राऊतांची ही पत्रकार परिषद म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. यावेळी किरीट सोमय्या म्हणाले की, "जर मी गुन्हा केला असेल तर मी आतमध्ये जाईन. विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जातेय. जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून साडेतीन लोकांची नाटकं. साडेतीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे मुहूर्त शोधत होते का?"