1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (09:07 IST)

संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा ; आशिष शेलारांचा सल्ला

ashish shelar
राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यातचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रीमंडळ  बैठकि वरुन एक ट्विट करत हे काय सुरू आहे ? असा राज्यपालांना सवाल केला आहे. तसेच गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही असा दावाही केला आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. तसेच घरी जाऊन राऊतांनी गजनी सिनेमा बघावा असा खोचक सल्लाही दिला आहे.

“त्यांच्या काळात किती मंत्री होते हे त्यांना आठवत नसेल, तर त्यांनी घरी जाऊन गजनी सिनेमा बघावा”, असा सल्ला शेलारांनी राऊतांना दिला आहे.
 
संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांनी घरी गेल्यावर गजनी सिनेमा नक्की बघावा. ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी हा सिनेमा बघावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे. ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी ३२ दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं, याचा अर्थ त्यांचे सरकारही अनाधिकृत होतं का? असा सवालही त्यांनी केला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. ही तुमच्या मालकीची कंपनी नाही, की मनात आलं तेव्हा तुम्ही निर्णय घेतला. हे सरकार संविधानिक पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे बुद्धीबेध करुन अशा वार्ता करु नका, असा सल्लाही शेलारांनी राऊतांना दिला आहे.