शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (09:18 IST)

'राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय'-श्रीरंग बारणे

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दूजाभाव केला जातोय. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप श्रीरंग बारणे यांनी केलाय.
 
मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना सोडावा या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हा आरोप केला आहे.

पार्थ पवार यांचा वाढदिवस 21 मार्चला पार पडला. पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेनं मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केली. यावर रोहित पवार यांना विचारण्यात आला असता, त्यांनी म्हटलं, "पार्थ पवार यांनी जर स्वत: मावळ मतदारसंघाची मागणी केली तर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यापासून ते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सर्वात आधी मी असेन"
 
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली.
 
पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळाल्यावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दुजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे" असे गंभीर आरोप बारणे यांनी केलेत.