रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 एप्रिल 2022 (15:02 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर ; राजू शेट्टींची मोठी घोषणा

raju shetti
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत आघाडीला झटका दिला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणीच्या बैठकीत केली आहे.
 
यावेळी बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. सर्वच पक्षाकडून समान वागणूक मिळाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  यांनी केली आहे.
 
ते पुढे म्हणाले की, कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे १ मे रोजी गाव सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाव ठराव करून घ्यायचा आहे. गावातल्या शेतकऱ्यांच्या मागणीवर संसदेत ठराव करायला भाग पाडू, मूलभूत अधिकार म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी देखील गाव सभेत ठराव घ्या. गावागावात जाऊन हुंकार यात्रा काढली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
 
तसेच पुढे ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) उपेक्षीत नागरिकांना उद्ध्वस्त केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहायचे की नाही याचा निर्णय आता घ्यायचा आहे. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नाही तर, चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचे ते म्हणाले.
 
एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला तर, घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की, एक स्वछ सरकार पाहिजे, काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे म्हणून आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने NDA मध्ये सहभागी झालो होतो असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
 
तसेच त्यावेळी आम्ही मोदी (Narendra Modi) यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात हे विचारले होते, त्यावेळी मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असे सांगितले होते. त्यावेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल असे म्हणाले होते.
 
दरम्यान राजू शेट्टी यांनी याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला होता. “महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल,” या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी (१ एप्रिल) सूचक इशारा दिला होता.