1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (20:53 IST)

हा प्रकार नक्कीच लाजीरवाणा ......... मासिक पाळी सुरु असल्याने मुलीला वृक्षारोपणापासून रोखले

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेत मासिक पाळी सुरु असल्याने एका मुलीला वृक्षारोपण करु दिले नाही. सदरच्या मुलीने हा प्रकार  पालकांना सांगितल्यानंतर हे समजले.  आता या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दिले आहेत. ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल घतेली आहे. सोबतच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
 
असे आहे प्रकरण 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत ही घटना घडली आहे. शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान शिक्षक आर.टी. देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहे, त्यांनी झाड लावू नये. मागच्या वेळेस झाडे जगली काही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जा केला .
 
मागच्या वर्षी आपण शाळेत वृक्षारोपण केले होते. मात्र ती झाडे जगली नाही, आता आपण पुन्हा वृक्षारोपण करत आहोत. मात्र, यंदा ज्या मुलींना मासिक पाळी आहे. त्यांनी वृक्षारोपण करू नये, असे म्हणत त्यांनी मला झाड लावू दिले नाही. याबाबत मी त्यांना विचारले, तर तू जास्त बोलते असे म्हणत बारावीच्या परीक्षेत तुला कमी मार्क देऊन असे धमकावण्यात आले आहे. 
 
मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला असं बोलल्याचा प्रसंग घडला. शाळेतील विद्यार्थिनींमध्ये शिक्षकाने सरळ सूचना केली. ज्यांची मासिक पाळी सुरु असेल त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल….या वक्तव्यामुळे विद्यार्थिनीला प्रचंड राग आला. सर तुम्ही असे कसे म्हणू शकता, असा प्रश्न विचारल्यावर, ‘तू कोण विचारणारी, उद्धट बोलते. लई शहाणी झालीस विचारणारी… असं वक्तव्य करून विद्यार्थिनीच्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. 
 
तुझी पाळी सुरु आहे. तू झाड लावलंस तर ते झाड मरेल, असा अजब तर्क  सांगून विद्यार्थिनीला बाजूला ठेवले. घडल्या प्रकाराचा संताप आल्याने सदर विद्यार्थिनीने घरी पालकांना हा किस्सा सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत.